
मुंबई (pragatbharat.com) : राज्य सरकारने अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजने’च्या अंमलबजावणीला आता वेग आला आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील सुमारे ३५ ते ४० लाख शेतकऱ्यांना फायदा होणार असून, यासाठी सरकारी तिजोरीवर २७ हजार कोटी रुपयांचा भार पडणार आहे. ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत ज्या शेतकऱ्यांचे २ लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज थकीत आहे, त्यांना या योजनेचा थेट लाभ मिळणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे की, खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी ही कर्जमाफी प्रक्रिया पूर्ण केली जाईल. तसेच, जे शेतकरी नियमित कर्जफेड करतात, त्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देखील दिले जाणार आहे. गेल्या दोन वर्षांत अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे संकटात सापडलेल्या बळीराजाला या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

