
मुंबई (pragatbharat.com) : विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या गोटात उमेदवारीबाबत मोठे मंथन सुरू आहे. शिंदे गटाकडे सध्या दोन जागा सुरक्षित असताना, एका जागेवर बच्चू कडू यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात आहे. मात्र, दुसऱ्या जागेसाठी नीलम गोऱ्हे आणि शितल म्हात्रे यांच्या नावांची जोरदार चर्चा सुरू असून पक्षात मोठा पेच निर्माण झाला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांनी आपली संघटना स्वतंत्र ठेवूनही मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत काम करण्याचा आणि शिवसेना मजबूत करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे एका जागेवर त्यांची वर्णी लागणार हे स्पष्ट झाले आहे. दुसऱ्या जागेसाठी विधान परिषदेच्या विद्यमान उपसभापती नीलम गोऱ्हे यांचे नाव अग्रक्रमी आहे, परंतु त्यांच्या नावाला पक्षांतर्गत काही स्तरावरून विरोध होत असल्याची चर्चा आहे. दुसरीकडे, पक्षाची आक्रमक बाजू मांडणाऱ्या शितल म्हात्रे यांचेही नाव शर्यतीत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापूर्वी राज्यसभा निवडणुकीत ज्याप्रमाणे अनपेक्षित नावे देऊन ‘धक्का तंत्राचा’ वापर केला होता, तसाच प्रकार यावेळीही पाहायला मिळण्याची शक्यता आहे. दोन्ही नेत्यांपैकी कोणाची वर्णी लागते की मुख्यमंत्री एखाद्या नवीन चेहऱ्याला संधी देऊन सर्वांना थक्क करतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होत असल्याने आज संध्याकाळपर्यंत या नावांवरील पडदा उठण्याची शक्यता आहे.

