
रतलाम (pragatbharat.com) : मध्यप्रदेशातील रतलाम (Ratlam) येथे आज पहाटेच्या सुमारास एक मोठा रेल्वे अपघात बालंबाल टळला आहे. तिरुवनंतपुरम-हजरत निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेस (गाडी क्रमांक १२४३१) च्या बी-१ (B-1) कोचला अचानक भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना कोटा विभागातील लुनी रिच्छा आणि विक्रमगढ अलोट स्थानकांदरम्यान आज पहाटे ५:२० च्या सुमारास घडली. रेल्वे प्रशासनाने दाखवलेल्या तत्परतेमुळे एक मोठा अनर्थ टळला आहे.
तातडीने वीज पुरवठा खंडित; बोगी केली वेगळी: रतलाम रेल्वे विभागाचे जनसंपर्क अधिकारी मुकेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रेनच्या बोगीला आग लागल्याचे समजताच रेल्वे कर्मचाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी अत्यंत वेगाने पावले उचलली. सर्वात आधी रेल्वेचा वीज पुरवठा (Power Supply) तात्काळ खंडित करण्यात आला. त्यानंतर आग लागलेला प्रभावित ‘B-1’ कोच मुख्य ट्रेनपासून यशस्वीपणे वेगळा (Detach) करण्यात आला, जेणेकरून आग इतर डब्यांमध्ये पसरणार नाही.
सर्व प्रवासी सुरक्षित; चौकशीचे आदेश: कोचला आग लागल्याचे लक्षात येताच डब्यातील सर्व प्रवाशांना कोणतीही इजा न होता सुखरूप आणि सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. सुदैवाने, या संपूर्ण घटनेत कोणताही प्रवासी किंवा रेल्वे कर्मचारी जखमी झालेला नाही व मोठी जीवितहानी टळली आहे. या अपघातामुळे या मार्गावरील काही गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम झाला असून काही रेल्वे गाड्या उशिराने धावत आहेत. राजधानी एक्स्प्रेसच्या वातानुकूलित डब्याला ही आग नेमकी कशामुळे लागली, याचा शोध घेण्यासाठी रेल्वे प्रशासनाने उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.

