
मुंबई (pragatbharat.com) : महाराष्ट्राच्या राजकारणात आज एक अत्यंत धक्कादायक आणि चर्चेची बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्यावर गुप्त भेट झाल्याचा दावा करण्यात येत आहे. या दाव्यामुळे राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी अशा दोन्ही गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे.
भेटीचा दावा आणि वास्तव: मिळालेल्या माहितीनुसार, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याशी संबंधित एका मीडिया हाऊसने या भेटीबाबतचा दावा केला आहे. मात्र, अधिकृत सूत्रांकडून अद्याप या भेटीला दुजोरा मिळालेला नाही. जर ही भेट खरोखरच झाली असेल, तर आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दुसरीकडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल एका कार्यक्रमात अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती निमित्त आयोजित ‘गोदा ते नर्मदा’ यात्रेच्या शुभारंभावेळी विकासाचा अजेंडा स्पष्ट केला. जलसंधारण आणि ग्रामीण परिवर्तनासाठी अहिल्यादेवींच्या कार्याचा वारसा पुढे नेणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

