मुंबई:(pragatbharat.com) पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डी. वाय. पाटील यांचे मंगळवारी महाराष्ट्रातील कोल्हापूर येथील निवासस्थानी दीर्घ आजारामुळे निधन झाले. त्यांनी वयाच्या 90 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. 22 ऑक्टोबर 1935 रोजी त्यांचा जन्म झाला होता. त्यांनी महाराष्ट्रात शिक्षणमहर्षी या उपाधीने ओळखले जात होते. त्यांनी शिक्षण, आरोग्य आणि क्रीडा क्षेत्रात मोठे साम्राज्य उभारले होते. डी.वाय. पाटील यांनी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून राजकीय कारकीर्दीची सुरुवात केली होती. मात्र, काही काळानंतर त्यांनी सक्रिय राजकारणापासून बाजूला होत आपले पूर्ण लक्ष शिक्षण क्षेत्रावर केंद्रित केले होते.

डॉ. डी. वाय. पाटील यांचा परिवार शिक्षण, आरोग्य, उद्योग आणि सार्वजनिक जीवनात सक्रिय आहे. त्यांच्या कुटुंबात अनेक सदस्य विविध शैक्षणिक संस्थांच्या व्यवस्थापनाशी संबंधित आहेत. त्यांचा मुलगा डॉ. संजय डी. वाय. पाटील, सतेज उर्फ बंटी डी वाय पाटील, विजय डी. पाटील, डॉ. अजिंक्य डी. वाय. पाटील यांच्यासह कन्या डॉ. नंदिता पालशेतकर आणि इतर सदस्य शिक्षण व आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांचे नातू ऋतुराज पाटील हेही सार्वजनिक जीवनात सक्रिय आहेत.
शिक्षण क्षेत्रातील कामगिरी
त्यांनी १९८३ मध्ये नवी मुंबईत ‘रामराव आदिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी’ (RAIT) या पहिल्या अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्थापना केली.आज त्यांच्या डी. वाय. पाटील ग्रुप अंतर्गत कोल्हापूर, मुंबई, पुणे यांसारख्या शहरांमध्ये ३ हून अधिक डीम्ड युनिव्हर्सिटीज, ६ खाजगी विद्यापीठे आणि १८० पेक्षा जास्त शिक्षण संस्था कार्यरत आहेत.अभियांत्रिकी, वैद्यकीय (मेडिकल), फार्मसी, मॅनेजमेंट, आर्किटेक्चर आणि कृषी यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये त्यांचे काम होते.
राजकीय कारकीर्द
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मधून त्यांनी राजकारणात पदार्पण केले. १९५७ ते १९६२ या काळात ते कोल्हापूरचे महापौर होते. त्यानंतर १९६७ आणि १९७२ मध्ये ते पन्हाळा मतदारसंघातून विधानसभेवर आमदार म्हणून निवडून आले.त्यांच्या प्रदीर्घ अनुभवामुळे त्यांची भारताच्या विविध राज्यांचे राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली
ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाबद्दल राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे.
शिक्षण, आरोग्य, क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रात डॉ. डी. वाय. पाटील यांनी उभारलेले कार्य सदैव स्मरणात राहील. आपल्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वातून त्यांनी अनेक शैक्षणिक व सामाजिक संस्थांची उभारणी करून असंख्य विद्यार्थ्यांना ज्ञान, शिक्षण व प्रगतीची संधी उपलब्ध करून दिली, असे त्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.
समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी केलेले कार्य अत्यंत प्रेरणादायी असून, त्यांच्या कार्याचा ठसा महाराष्ट्रासह देशाच्या सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रावर कायम राहील. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक महान शिक्षणमहर्षी, दूरदृष्टीचे समाजसेवक आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व गमावले आहे. त्यांची समाजाप्रती असलेली निष्ठा, कार्यतत्परता आणि लोककल्याणाची भावना भावी पिढ्यांना सदैव मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरेल, असेही राज्यमंत्री मिसाळ यांनी म्हटले आहे.
पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या पवित्र स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करताना, राज्यमंत्री मिसाळ यांनी त्यांच्या कुटुंबीयांच्या व आप्तेष्टांच्या दुःखात आपण सहभागी असल्याची भावना व्यक्त केली आहे. परमेश्वर दिवंगत आत्म्यास चिरशांती देवो व त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती प्रदान करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

