

मुंबई (pragatbharat.com) : देशभरात वाढणाऱ्या इंधन दराच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळातून एक मोठी आणि सकारात्मक बातमी समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना तसेच लोकप्रतिनिधींना केलेल्या इंधन बचतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी एक आदर्श निर्णय घेतला आहे. सुनेत्रा पवार यांनी आपल्या दैनंदिन प्रवासासाठी आणि शासकीय दौऱ्यांसाठी आता थेट इलेक्ट्रिक कार (EV) वापरण्यास सुरुवात केली आहे.
चमचमती सोनेरी रंगाची कार ठरतेय आकर्षणाचे केंद्र सोमवारपासून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या ताफ्यात ही नवीकोरी इलेक्ट्रिक कार दाखल झाली असून, पहिल्याच दिवशी ती मुंबईत सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र ठरली. या कारचा चमचमता सोनेरी रंग अत्यंत आकर्षक आणि नजरेत भरणारा आहे. पर्यावरणपूरक आणि आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेल्या या गाडीतून प्रवास करत त्यांनी थेट प्रशासकीय कामांना हजेरी लावली. पंतप्रधान मोदी यांनी इंधन बचतीचे आवाहन केल्यानंतर राज्य सरकारमधील अनेक मंत्र्यांनी आणि नेत्यांनी आपल्या ताफ्यातील गाड्या कमी करण्यास तसेच ईव्ही वाहनांचा वापर वाढवण्यास सुरुवात केली आहे. या अंतर्गत राज्य सरकारने व्हीआयपी दौऱ्यांमधील मोठे बडेजाव आणि अवाजवी खर्च टाळण्याचाही निर्णय घेतला आहे.
पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांचा फटका राज्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींनी नवा उच्चांक गाठला आहे. मंगळवारी झालेल्या ताज्या दरवाढीनंतर राज्यातील प्रमुख शहरांमध्ये पेट्रोलचा प्रतिलीटर दर १०७ रुपयांच्या पलीकडे गेला आहे, तर डिझेलचा दर प्रतिलीटर ९४ रुपयांच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. वाढत्या इंधन दरामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले असतानाच, व्हीआयपी नेत्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी इलेक्ट्रिक वाहनांकडे वळणे हा एक महत्त्वाचा संदेश मानला जात आहे. या निर्णयामुळे शासकीय पातळीवरील इंधनावरील खर्च तर वाचेलच, शिवाय पर्यावरण रक्षणाच्या मोहिमेलाही यामुळे बळ मिळणार आहे.

