
चेन्नई (pragatbharat.com) : लोकशाहीमध्ये प्रत्येक मत किती महत्त्वाचे असते, याचा प्रत्यय तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या निकालातून आला आहे. तामिळनाडूचे सहकार मंत्री आणि डीएमके (DMK) पक्षाचे ज्येष्ठ नेते के. आर. पेरियाकरुप्पन यांचा तिरुप्पत्तूर मतदारसंघात केवळ १ मताने अत्यंत धक्कादायक पराभव झाला आहे.
या चुरशीच्या लढतीत टीव्हीके (TVK) पक्षाचे उमेदवार सीनिवास सेथुपती यांनी ८३,३७५ मते मिळवून विजय मिळवला, तर पेरियाकरुप्पन यांना ८३,३७४ मते मिळाली. शेवटच्या फेरीपर्यंत पेरियाकरुप्पन ३० मतांनी आघाडीवर होते, मात्र अंतिम फेरीतील एका मताने संपूर्ण निकालच बदलून टाकला. पेरियाकरुप्पन हे २००६ पासून सलग चार वेळा या मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते, मात्र यावेळच्या निसटत्या पराभवाने त्यांच्या विजयाची परंपरा खंडित झाली आहे.
या निकालात मतदानावर टाकलेला बहिष्कार निर्णायक ठरला. तिरुप्पत्तूरमधील आर. पलकुरीची पंचायतीच्या सुमारे २,००० मतदारांनी प्रशासकीय सीमा वादावरून मतदानावर बहिष्कार टाकला होता. जर या मतदारांनी मतदान केले असते, तर निकालाचे चित्र वेगळे असू शकले असते. एका मताने मंत्रिपद गमावल्याने संपूर्ण तामिळनाडूमध्ये या निकालाची चर्चा सुरू आहे. निवडणूक आयोगाच्या मते, ही मतमोजणी पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने पार पडली आहे.

