पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील तळगाव-चिखली प्रभाग क्रमांक १ मधील धर्मराज नगर परिसरात अतिवृष्टीमुळे पावसाच्या पाण्याचा मोठा प्रवाह निर्माण झाला. ब्लू डायस सोसायटीची सीमाभिंत फुटल्याने पाणी सोसायटी परिसर, पार्किंग आणि धर्मराज नगर कॉलनीत शिरल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे
पुणे (pragatbharat.com): पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील चिखली प्रभाग क्रमांक १ मधील धर्मराज नगर परिसरात अतिवृष्टीमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. पावसाच्या पाण्याचा मोठा लोंढा परिसरात शिरल्याने ब्लू डायस सोसायटीची सीमाभिंत फुटली आणि सोसायटी पार्किंगसह धर्मराज नगर परिसरात पाणी साचल्याचे नागरिकांनी सांगितले.

धर्मराज नगर, पाटील नगर आणि आसपासच्या भागात मोठ्या प्रमाणावर बांधकामे सुरू आहेत. मात्र, रस्ते, पावसाच्या पाण्याचा निचरा आणि नैसर्गिक जलप्रवाह यांचे योग्य नियोजन नसल्यामुळे या भागात दरवर्षी पावसाळ्यात पाणी साचण्याची समस्या निर्माण होत असल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, पूर्वी या भागातून जाणारे नैसर्गिक ओढे, नाले आणि पाण्याचे प्रवाह आता बांधकामे, अतिक्रमणे आणि अनियोजित शहरीकरणामुळे बाधित झाले आहेत. त्यामुळे अतिवृष्टीच्या काळात पावसाचे पाणी वाहून जाण्यास मार्ग राहत नाही आणि ते थेट रहिवासी भागात शिरते.
दिनांक ६ ते १० जुलै दरम्यान झालेल्या मुसळधार पावसामुळे धर्मराज नगर परिसरात पावसाच्या पाण्यासोबत सांडपाण्याचाही मोठा प्रश्न निर्माण झाला. पाणी सोसायटी परिसरात आणि रस्त्यांवर साचल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात आली. काही जागरूक नागरिक, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी पुढाकार घेतल्याने मोठी जीवितहानी टळल्याचे स्थानिकांनी सांगितले.
या भागातील अरुंद रस्ते, वाढते काँक्रीटीकरण, पेव्हिंग ब्लॉकचा अतिरेकी वापर आणि नियोजनशून्य बांधकामांमुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरण्याची क्षमता कमी झाली आहे. त्यामुळे मुख्य रस्ते, चौक, महामार्गालगतचे भाग आणि निवासी वसाहतींमध्ये पाणी साचण्याचे प्रमाण वाढत आहे.
स्थानिक नागरिकांनी पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाकडे नैसर्गिक जलप्रवाह, नाले, ओढे आणि पावसाच्या पाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था पुन्हा तपासण्याची मागणी केली आहे. तसेच अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणे आणि पाण्याच्या मार्गांवरील अडथळे दूर करून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशीही मागणी करण्यात आली आहे.
धर्मराज नगर परिसरात भविष्यात पुन्हा अशी परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी महापालिकेच्या बांधकाम विभाग, जलनिस्सारण विभाग आणि संबंधित विभागांनी संयुक्त पाहणी करून योग्य नियोजन करणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

