
मुंबई (pragatbharat.com) : मालाडमध्ये हवेत गोळीबार केल्याच्या १६ वर्षे जुन्या प्रकरणातून मुंबईतील दोन बड्या व्यावसायिकांची बोरीवली न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. दक्षिण मुंबईतील रहिवासी असलेले दिलीप कन्हैयालाल बॉम्बेवाला (५३) आणि प्रतीक रसिकलाल गोराडिया (५७) यांच्यावर २०१० मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, पोलिसांनी सादर केलेल्या पुराव्यांमध्ये तथ्य नसल्याचे स्पष्ट करत न्यायालयाने त्यांना या आरोपातून मुक्त केले आहे.
नेमकी घटना काय होती? २२ सप्टेंबर २०१० रोजी मालाड पश्चिम येथील लिंक रोडवरील ‘गार्डन व्ह्यू बार’बाहेर ही घटना घडली होती. मद्यधुंद अवस्थेत असताना या दोघांनी आपल्या परवानाधारक पिस्तूलमधून हवेत गोळीबार केल्याचा आरोप मालाड पोलिसांनी केला होता. पोलिसांनी घटनास्थळावरून पिस्तूल आणि जिवंत काडतुसे जप्त केल्याचा दावा केला होता. या प्रकरणी शस्त्र अधिनियमाच्या विविध कलमान्वये त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला होता.
न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल बचाव पक्षाचे वकील सुनील पांडे यांनी न्यायालयात युक्तिवाद केला की, पोलिसांनी केलेली कारवाई ही पुराव्यांवर आधारित नव्हती. “गोळीबार झाल्याचा कोणताही वैज्ञानिक पुरावा, सीसीटीव्ही फुटेज किंवा बॅलेस्टिक रिपोर्ट पोलिसांकडे उपलब्ध नव्हता. तसेच, परवानाधारक शस्त्र बाळगणे हा गुन्हा ठरत नाही,” असा युक्तिवाद त्यांनी मांडला. न्यायालयाने हा युक्तिवाद मान्य करत, पुराव्यांची साखळी अपूर्ण असल्याचे सांगत दोन्ही व्यावसायिकांची निर्दोष मुक्तता केली.

