
मुंबई (pragatbharat.com) : महाराष्ट्रात राहून व्यवसाय करणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांना आता मृती भाषा येणे अनिवार्य करण्यात आले आहे. राज्य सरकारच्या या निर्णयावरून मुंबईत राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आणि माजी खासदार संजय निरुपम यांच्यात जोरदार संघर्ष पाहायला मिळत आहे. या वादावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली पहिली अधिकृत प्रतिक्रिया दिली आहे.
काय आहे नेमका वाद? परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी १ मे (महाराष्ट्र दिन) पासून रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी वाचता, लिहिता आणि बोलता येणे बंधनकारक असल्याचे जाहीर केले. जे चालक यामध्ये अपयशी ठरतील, त्यांचे परवाने रद्द करण्याचा इशाराही सरकारने दिला आहे. या निर्णयाला संजय निरुपम यांनी विरोध करत चालकांना “घाबरू नका” असे आवाहन केले, त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी दहीसर परिसरात त्यांच्याविरोधात निदर्शने केली.
देवेंद्र फडणवीस यांचे मोठे विधान: या वादावर भाष्य करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “मुंबई असो किंवा संपूर्ण महाराष्ट्र, मराठी भाषेला प्राधान्य देणे आणि तिचा प्रचार करणे यात काहीही चुकीचे नाही. परंतु, कोणत्याही भाषेची सक्ती करण्यापेक्षा, ज्यांना मराठी येत नाही अशा चालकांना प्रशिक्षण देण्यावर सरकार भर देणार आहे.” कोणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही, पण राज्यात राहणाऱ्यांनी स्थानिक भाषेशी जुळवून घेणे ही त्यांची जबाबदारी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सरकारचा मास्टर प्लॅन: सरकारने या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी ‘मुंबई मराठी साहित्य संघ’ आणि ‘कोकण मराठी साहित्य परिषद’ यांची मदत घेण्याचे ठरवले आहे. या संस्थांच्या माध्यमातून चालकांसाठी मोफत मराठी भाषेचे वर्ग चालवले जातील. दरम्यान, मनसेचे संदीप देशपांडे यांनी “मराठी न बोलणाऱ्या उद्धट चालकांना धडा शिकवण्याची वेळ आली आहे” असे म्हणत रिक्षांवर ‘मला मराठी येते’ असे स्टिकर्स लावण्याची मोहीम सुरू केली आहे.

