मुंबई (pragatbharat.com) :
आगामी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. केंद्र सरकारमध्ये शिवसेनेचे (एकनाथ शिंदे गट) महत्त्व वाढवण्यासाठी आणि मंत्रिपद मिळवण्यासाठी ‘ऑपरेशन टायगर’ राबवले जात असल्याचा दावा राजकीय वर्तुळात केला जात आहे. तसेच, खासदार श्रीकांत शिंदे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळावे, म्हणूनच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सर्व हालचाली केल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. या सर्व चर्चांवर आणि आरोपांवर शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईतील गोरेगाव येथे आयोजित जाहीर मेळाव्यात बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सडेतोड भाष्य केले आहे.
श्रीकांतने पद आणि मंत्रिपद नम्रपणे नाकारले: मेळाव्यात बोलताना एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ नेते रामदास कदम यांच्या एका प्रस्तावाचा संदर्भ दिला. रामदास कदम यांनी श्रीकांत शिंदे यांना शिवसेनेचे ‘युवासेना प्रमुख’ पद देऊन पक्षाचे ‘राष्ट्रीय सरचिटणीस’ करावे, अशी जाहीर मागणी केली होती. यावर स्पष्टीकरण देताना उपमुख्यमंत्री म्हणाले, “जेव्हा मी स्वतः श्रीकांतला या पदांबाबत विचारले, तेव्हा त्याने ‘आपण आपल्या इतर सर्वसामान्य कार्यकर्त्यांना पुढे करूया’, असे सांगत ही पदे नम्रपणे नाकारली. इतकेच नाही तर केंद्रीय मंत्रिपदाबाबतही जेव्हा चर्चा झाली, तेव्हाही त्याने अत्यंत नम्रपणे नकार दिला होता.”
कर्तृत्व असेल तर अन्याय करणार नाही: मंत्रिपदाच्या आणि घराणेशाहीच्या आरोपांना उत्तर देताना एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, “ही बाळासाहेबांची शिवसेना आहे. केवळ आमदाराचा, खासदाराचा किंवा मुख्यमंत्र्याचा मुलगा आहे म्हणून कुणालाही पक्षात सहज संधी मिळणार नाही. केवळ वारसदार असणे हे आमचे ‘क्वालिफिकेशन’ (पात्रता) ठरत नाही. परंतु, जर एखाद्याने प्रामाणिकपणे काम केले असेल, स्वतःचे कर्तृत्व सिद्ध केले असेल, तर त्याच्यावर केवळ कोणाचा मुलगा आहे म्हणून अन्यायही केला जाणार नाही.” या प्रस्तावावर आता पक्षातील ज्येष्ठ नेते आणि पदाधिकारी मिळून अंतिम निर्णय घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मी सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा: आपल्या राजकीय प्रवासाची आठवण करून देताना एकनाथ शिंदे भावूक झाले. ते म्हणाले, “मी स्वतः एका अत्यंत सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा असून आज या राज्याचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचलो आहे. या प्रवासात मी प्रचंड संघर्ष आणि अनेक चढ-उतार पाहिले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या कष्टाची किंमत मला चांगलीच ठाऊक आहे.”
एकनाथ शिंदे यांच्या या विधानामुळे श्रीकांत शिंदे यांच्या केंद्रीय मंत्रिपदाबाबत सुरू असलेल्या चर्चांना आता पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे.


