
नवी दिल्ली (pragatbharat.com) : “सोमनाथ मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नसून ते भारताचा स्वाभिमान, लवचिकता आणि अदम्य जिद्दीचे प्रतीक आहे,” असे गौरवपूर्ण उद्गार केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी काढले. नवी दिल्ली येथे ‘सोमनाथ स्वाभिमान पर्व यात्रे’चे उद्घाटन करताना ते बोलत होते.
या खास यात्रेअंतर्गत सफदरजंग रेल्वे स्थानकावरून सुमारे १,३०० भाविकांना घेऊन जाणारी एक विशेष रेल्वे सोमनाथ मंदिराकडे (गुजरात) रवाना झाली. या रेल्वेला केंद्रीय मंत्री शेखावत, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता आणि दिल्लीचे सांस्कृतिक मंत्री कपिल मिश्रा यांनी हिरवा झेंडा दाखवला. सोमनाथ मंदिरावरील अढळ श्रद्धेच्या एक हजार वर्षांच्या स्मृतीनिमित्त या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या प्रसंगी बोलताना शेखावत म्हणाले की, ही यात्रा नागरिकांना भारताच्या गौरवशाली इतिहासातून आणि पूर्वजांच्या पराक्रमातून प्रेरणा घेण्यासाठी प्रोत्साहित करेल. वारंवार होणाऱ्या आक्रमणांनंतरही पुन्हा उभे राहण्याची जी शक्ती सोमनाथ मंदिराने देशाला दिली, तीच ऊर्जा या यात्रेच्या माध्यमातून जनमानसात पोहोचवली जाणार आहे. या उपक्रमामुळे देशातील सांस्कृतिक एकात्मतेला अधिक बळकटी मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

