
कोलकाता/नवी दिल्ली (pragatbharat.com) : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि अंतिम टप्प्यासाठी सुरू असलेला हायव्होल्टेज प्रचार आज (२७ एप्रिल) सायंकाळी थंडावणार आहे. या टप्प्यात राज्यातील १४२ मतदारसंघांमध्ये येत्या २९ एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. आज प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि भाजपच्या दिग्गज नेत्यांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी आपली पूर्ण ताकद पणाला लावली आहे.
दुसऱ्या टप्प्यामध्ये कोलकाता उत्तर, कोलकाता दक्षिण, हावडा, नदिया, उत्तर २४ परगणा, दक्षिण २४ परगणा, हुगळी आणि पूर्व बर्धमान या आठ महत्त्वाच्या जिल्ह्यांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जगतदल येथे जाहीर सभेला संबोधित करणार आहेत, तर गृहमंत्री अमित शाह बेहाला आणि चंदननगर येथे भव्य रोड शो करणार आहेत. दुसरीकडे, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी जाधवपूर आणि स्वतःच्या भवानीपूर मतदारसंघात पदयात्रा आणि सभांद्वारे शक्तिप्रदर्शन करणार आहेत.
पहिल्या टप्प्यात २३ एप्रिल रोजी विक्रमी ९३.१९% मतदान झाले होते, त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातही मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. निवडणूक आयोगाने या टप्प्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली असून १४२ जागांवर शांततेत मतदान व्हावे, यासाठी निमलष्करी दलाच्या तुकड्या तैनात केल्या आहेत. या सर्व निवडणुकांचा निकाल ४ मे २०२६ रोजी जाहीर होणार असून, संपूर्ण देशाचे लक्ष या निकालांकडे लागले आहे.

