
पुणे (pragatbharat.com) : भारत आणि अमेरिका यांच्यातील प्रस्तावित अंतरिम व्यापार करार (Interim Trade Agreement) आता अगदी अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. भारतातील अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या ऐतिहासिक कराराची केवळ १ टक्का चर्चा शिल्लक आहे. हा प्रलंबित भाग पूर्ण करून करारावर अंतिम मोहर उमटवण्यासाठी १ ते ४ जून २०२६ दरम्यान अमेरिकेचे एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ भारताचा दौरा करणार आहे.
दिल्लीतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) येथे आयोजित ‘यूएस-इंडिया ट्रस्ट’ उपक्रमाच्या कार्यक्रमात राजदूत सर्जिओ गोर यांनी ही महत्त्वाची घोषणा केली. या वर्षाच्या सुरुवातीला वॉशिंग्टनमध्ये झालेल्या द्विपक्षीय चर्चेनंतर आता ही अंतिम फेरी भारतात पार पडणार आहे.
भारतीय संघाने नुकतीच केली होती वॉशिंग्टनची वारी: व्यापार कराराच्या तांत्रिक मुद्द्यांना अंतिम रूप देण्यासाठी भारताने गेल्या आठवड्यातच आपले एक विशेष शिष्टमंडळ वॉशिंग्टन डीसी येथे पाठवले होते. तिथे दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाली. आता अमेरिकेचे मुख्य व्यापार वार्ताहर स्वतः आपल्या टीमसह भारतात येत असून, या दौऱ्यात प्रलंबित मुद्द्यांवर तोडगा निघून करारावर स्वाक्षरी होण्याची दाट शक्यता आहे.
दोन दशकांत व्यापारात अफाट वाढ: भारत आणि अमेरिका यांच्यातील आर्थिक आणि व्यापारी संबंध गेल्या काही वर्षांत झपाट्याने विस्तारले आहेत. राजदूतांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या दोन दशकांत दोन्ही देशांमधील वस्तू आणि सेवांमधील द्विपक्षीय व्यापार २० अब्ज डॉलर्सवरून थेट २२० अब्ज डॉलर्सच्या (220 Billion Dollars) पुढे गेला आहे. हा नवीन व्यापार करार दोन्ही देशांमधील आर्थिक एकात्मता अधिक बळकट करेल.
डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचे ध्येय आणि कराराची चौकट: अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाचे मुख्य उद्दिष्ट उभय देशांतील व्यापाराला अशा प्रकारे चालना देणे आहे, ज्यामुळे अमेरिकन कंपन्या आणि कामगारांसाठी अभूतपूर्व संधी निर्माण होतील. भारत आणि अमेरिकेने फेब्रुवारी २०२६ मध्येच या अंतरिम व्यापार कराराच्या चौकटीवर सहमती दर्शविली होती.
भारताच्या वाणिज्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही देशांमध्ये प्रामुख्याने बाजारपेठ प्रवेश (Market Access), सीमाशुल्क प्रक्रिया, नॉन-टॅरिफ अडथळे, व्यापार सुलभता आणि आर्थिक सुरक्षा सहकार्य यांसारख्या मुद्द्यांवर अंतिम बोलणी सुरू आहे. या करारामुळे भारतीय उत्पादनांना अमेरिकेत मोठी बाजारपेठ मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.


