
नवी दिल्ली (pragatbharat.com) : बॉलिवूडची ‘क्वीन’ तथा भाजप खासदार कंगना राणौत हिचा आगामी बहुप्रतिक्षित चित्रपट ‘भारत भाग्य विधाता’ (Bharat Bhhagya Viddhaata) लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी देशभरात ‘रिअल हिरोज’चा (संकटकाळात देशाची सेवा करणाऱ्या नागरिकांचा) सन्मान करण्यासाठी एक विशेष मोहीम राबवली जात आहे. भुवनेश्वर आणि रायपूरनंतर ही मोहीम देशाची राजधानी दिल्लीत पोहोचली. दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या चित्रपटाच्या विशेष स्क्रीनिंगला दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी हजेरी लावली. याबद्दल कंगनाने मुख्यमंत्र्यांचे जाहीर आभार मानले असून त्यांच्या दिल्लीतील सुशासनाचे तोंडभरून कौतुक केले आहे.
“रेखाजींच्या नेतृत्वाखाली दिल्लीचा कायापालट” – कंगना राणौत विशेष स्क्रीनिंग दरम्यान माध्यमांशी बोलताना कंगना राणौत म्हणाली, “मी आमच्या संपूर्ण चित्रपटाच्या टीम वतीने दिल्लीच्या माननीय मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांचे मनापासून आभार मानते. रेखाजींनी दिल्लीचा कारभार ज्या प्रकारे सांभाळला आहे, ते संपूर्ण देशाला माहित आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीचा पूर्णपणे कायापालट झाला आहे. त्यांनी प्रभावी उपाययोजना करून दिल्लीतील पर्यावरण आणि वायू प्रदूषणाची गंभीर समस्या नियंत्रणात आणली आहे. दुर्दैवाने या चांगल्या गोष्टींवर फारसे लिहिले जात नाही, फक्त नकारात्मक बातम्याच समोर येतात. मी जेव्हा त्यांना या स्क्रीनिंगचे आमंत्रण दिले, तेव्हा त्यांनी एका क्षणात होकार दिला. मी त्यांची नेहमीच ऋणी राहीन.”
देशाचा प्रत्येक नागरिक हाच ‘भारत भाग्य विधाता’ – मुख्यमंत्री रेखा गुप्ता या प्रसंगी मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनीही कंगनाचे कौतुक केले. त्या म्हणाल्या, “कंगना राणौत ही संसदेतील एक खंबीर आवाज आहे, जी भारतीय सिनेमा आणि जनतेच्या कल्याणासाठी सतत लढत असते. ती केवळ संसदेतच नव्हे, तर रुपेरी पडद्यावरूनही तिची मते परखडपणे मांडते. हा चित्रपट सांगतो की, देशसेवा आणि राष्ट्रभक्ती केवळ गणवेश घालणाऱ्यांपुरती मर्यादित नाही. जेव्हा देशावर संकट येते, तेव्हा प्रत्येक भारतीय मदतीसाठी पुढे येतो. आपल्या देशाचे सामान्य नागरिक हेच खरे ‘भारत भाग्य विधाता’ आहेत.”
दिग्गज केंद्रीय मंत्र्यांची मांदियाळी आणि प्रदर्शन तारीख दिल्लीतील या हाय-प्रोफाइल स्क्रीनिंगला केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी, केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री गजेंद्रसिंह शेखावत, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. राजभूषण चौधरी, प्रतापराव जाधव, गिरीराज सिंह आणि कॅबिनेट मंत्री आशिष सूद यांच्यासह अनेक खासदार आणि प्रतिष्ठीत व्यक्ती उपस्थित होत्या. पेन स्टुडिओचे डॉ. जयंतीलाल गडा यांची प्रस्तुती असलेला आणि मणिकर्णिका फिल्म्स निर्मित हा चित्रपट येत्या १२ जून २०२६ रोजी जगभर प्रदर्शित होणार आहे.


