
नवी मुंबई (pragatbharat.com) : महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील विकासकामांना अधिक गती देण्यासाठी आणि पंचायत राज व्यवस्थेचे सक्षमीकरण करण्यासाठी नवी मुंबईतील खारघर येथे ‘ग्रामविकास भवन’ या अत्याधुनिक शासकीय इमारतीची उभारणी करण्यात आली आहे. या नवनिर्मित संकुलाची राज्याचे ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी आज प्रत्यक्ष भेट देऊन सविस्तर पाहणी केली. “या भव्य आणि आधुनिक ग्रामविकास भवनामुळे राज्यातील ग्रामीण प्रशासनाला एक नवी आणि प्रगत दिशा लाभणार आहे,” असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
प्रशासकीय समन्वय आणि प्रशिक्षणाचे मुख्य केंद्र ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या विविध लोककल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे, जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांमध्ये योग्य प्रशासकीय समन्वय साधणे आणि ग्रामीण लोकप्रतिनिधी व कर्मचाऱ्यांसाठी आधुनिक प्रशिक्षण उपक्रम राबवणे, या उद्देशाने हे संकुल विकसित करण्यात आले आहे. मंत्री जयकुमार गोरे यांनी या भवनातील विविध प्रशासकीय विभाग, हायटेक प्रशिक्षण कक्ष, व्हीआयपी बैठक व्यवस्था आणि इतर पायाभूत सुविधांचा बारकाईने आढावा घेतला.
आधुनिक तंत्रज्ञानावर शासनाचा भर या प्रसंगी बोलताना ग्रामविकासमंत्र्यांनी स्पष्ट केले की, ग्रामीण विकास विभागाच्या दैनंदिन कामकाजात अधिक सुसूत्रता, पारदर्शकता, समन्वय आणि कार्यक्षमता निर्माण व्हावी, यासाठी संपूर्ण इमारतीमध्ये आधुनिक डिजिटल तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यावर शासनाने भर दिला आहे. राज्यातील ग्रामपंचायतींच्या कारभाराला डिजिटल जोड देण्यासाठी हे केंद्र भविष्यात मार्गदर्शक ठरणार आहे.
ग्रामीण विकासाला मिळणार अभूतपूर्व गती ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी सक्षम व आधुनिक प्रशासकीय यंत्रणा उभारणे ही काळाची गरज आहे, असे नमूद करत मंत्री गोरे म्हणाले की, राज्यातील ग्रामविकासाशी संबंधित सर्व महत्त्वाचे उपक्रम, धोरणात्मक निर्णय आणि प्रशासकीय नियोजन अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी ‘ग्रामविकास भवन’ हे एक मध्यवर्ती आणि महत्त्वपूर्ण केंद्र म्हणून उपयुक्त ठरेल.



