जिद्द आणि चिकाटी! ६८ वर्षीय आजींनी मिळवले ६० टक्के गुण; चहाचे दुकान चालवून मुंबईच्या मंगला ठोके यांची बारावीत झेप

मुंबई (pragatbharat.com) : ‘शिकण्याला वयाचे बंधन नसते’ हे ब्रीदवाक्य मुंबईच्या मंगला ठोके यांनी प्रत्यक्षात उतरवून दाखवले आहे. विक्रोळी येथे राहणाऱ्या ६८ वर्षीय मंगलाताईंनी नुकत्याच जाहीर झालेल्या बारावीच्या परीक्षेत (HSC 2026) ६० टक्के गुण मिळवून देदीप्यमान यश संपादन केले आहे. सकाळी चहाचे दुकान चालवून आणि रात्री रात्रशाळेत अभ्यास करून त्यांनी मिळवलेल्या या यशाने अख्ख्या मुंबईचे लक्ष वेधून घेतले आहे.

मंगलाताईंचा हा प्रवास अत्यंत संघर्षाचा राहिला आहे. लहानपणी कौटुंबिक परिस्थितीमुळे शिक्षण सोडावे लागले, त्यानंतर लग्न आणि संसाराच्या व्यापात शिक्षणाची ओढ मनातच राहिली. काही वर्षांपूर्वी पतीचे निधन झाल्यानंतर पाच मुलींची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली. विक्रोळी येथील सरस्वती शाळेत शिपाई म्हणून काम करताना विद्यार्थ्यांकडे पाहून आपल्यालाही शिकावे असे त्यांना नेहमी वाटायचे. निवृत्तीनंतर त्यांनी ही इच्छा पूर्ण करण्याचे ठरवले आणि कांजूरमार्ग येथील रात्रशाळेत आठवीत प्रवेश घेतला.

घरकाम, पाच मुलींची जबाबदारी आणि वयोमानानुसार येणाऱ्या शारीरिक मर्यादांवर मात करत मंगलाताईंनी जिद्दीने अभ्यास सुरू ठेवला. दहावी उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी विक्रोळीच्या शारदा नाईट हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. “माझ्या या यशात माझ्या पाचही मुलींचा मोठा वाटा आहे, त्यांच्या पाठिंब्यामुळेच मी हे स्वप्न पूर्ण करू शकले,” असे मंगलाताई अभिमानाने सांगतात. आजच्या तरुण पिढीसाठी मंगलाताईंची ही संघर्षगाथा एक मोठी प्रेरणा ठरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *