बुलढाणा जिल्हा नियोजन समिती बैठक: ५३३ कोटींच्या जिल्हा वार्षिक योजनेचा आढावा; ‘iPAS’ प्रणालीचा १०० टक्के वापर करण्याचे पालकमंत्री मकरंद जाधव पाटील यांचे निर्देश

बुलढाणा (pragatbharat.com) : “जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत मंजूर करण्यात येणाऱ्या सर्व विकासकामांच्या दर्जावर आणि गुणवत्तेवर यंत्रणेने विशेष भर दिला पाहिजे. सर्वच विभागांनी कामांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी ‘iPAS’ (Integrated Planning and Administrative Approval System) या संगणकीय प्रणालीचा १०० टक्के वापर करावा,” असे निर्देश राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिले आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयातील जिजाऊ सभागृहात आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या (DPC) महत्त्वपूर्ण आढावा बैठकीत ते दृकश्राव्य (Video Conference) माध्यमातून मार्गदर्शन करत होते. या बैठकीला वस्त्रोद्योग मंत्री तथा सहपालकमंत्री संजय सावकारे, केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव, कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांच्यासह जिल्ह्यातील सर्व आमदार आणि लोकप्रतिनिधी ऑनलाईन सहभागी झाले होते. तर सभागृहात जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण कुमार देवरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

५३३ कोटी रुपयांच्या निधीचा सविस्तर ताळेबंद:

बैठकीत आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या जिल्हा वार्षिक योजनेचा (सर्वसाधारण) सविस्तर आढावा घेण्यात आला. जिल्ह्यासाठी एकूण ५३३ कोटी रुपयांचा नियतव्यय मंजूर असून, त्यापैकी ६० टक्के निधी प्रशासनाला प्राप्त झाला आहे. विविध क्षेत्रांसाठी करण्यात आलेली आर्थिक तरतूद खालीलप्रमाणे आहे:

विकास क्षेत्रकरण्यात आलेली आर्थिक तरतूद
गाभा क्षेत्र (Core Sectors)₹ ३५७.२८ कोटी
सामाजिक व सामूहिक सेवा₹ २०९.५१ कोटी
कृषी व संलग्न क्षेत्र₹ ५३.३५ कोटी
ऊर्जा विकास कार्यक्रम₹ ३५.०० कोटी
पाटबंधारे व पूरनियंत्रण₹ ३२.२२ कोटी
ग्रामीण विकास कामे₹ २७.२० कोटी

याशिवाय, आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत २०.७८ कोटी आणि अनुसूचित जाती उपयोजनेसाठी ९९ कोटी रुपयांच्या निधीतून नाविन्यपूर्ण व सामाजिक क्षेत्रातील कामांना प्राधान्य दिले जाणार आहे.

स्मशानभूमी आणि नाला खोलीकरणाला प्राधान्य:

पालकमंत्री मकरंद जाधव पाटील यांनी जल जीवन मिशन, जिल्हा परिषद आणि ‘मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजना’ यांतर्गत सुरू असलेल्या कामांची तांत्रिक स्थिती जाणून घेतली. ज्या गावांमध्ये अद्याप स्मशानभूमी नाही, तिथे आर्थिक वर्ष २०२६-२७ मध्ये प्राधान्याने कामे हाती घेण्याचे आदेश त्यांनी दिले. तसेच पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नाला खोलीकरणाच्या कामांना गती देण्याचे निर्देश देत आवश्यक निधी तातडीने उपलब्ध करून दिला जाईल, असे स्पष्ट केले.

तीन तीर्थक्षेत्रांना ‘क’ वर्ग दर्जाचे प्रस्ताव:

बैठकीत जिल्ह्यातीला तीन प्रमुख धार्मिक स्थळांना ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्याबाबतचे प्रस्ताव प्राप्त झाल्याचे नियोजन विभागाने सांगितले. यामध्ये बुलढाणा तालुक्यातील रुईखेड टेकाळे येथील ‘दत्त महानुभाव समाजसेवा मंडळ’, मेहकर तालुक्यातील शेंदला येथील ‘संत गजानन महाराज संस्थान’ आणि खामगाव तालुक्यातील घाटपुरी येथील ‘सद्गुरु श्रीधर महाराज चॅरिटेबल ट्रस्ट’ या प्रस्तावांचा समावेश असून त्यांना मंजुरी देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. सर्व यंत्रणांनी विहीत मुदतीत प्रशासकीय मान्यता मिळवून नागरिकांना वेळेत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे आवाहन पालकमंत्र्यांनी शेवटी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *