
नवी दिल्ली (pragatbharat.com) : भाजपचे नवनियुक्त खासदार राघव चढ्ढा, अशोक मित्तल, संदीप पाठक आणि राजेंद्र गुप्ता यांनी आज राष्ट्रपती भवनात जाऊन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. पंजाबमधील आम आदमी पार्टीच्या (AAP) नेतृत्वाखालील सरकारकडून राज्य यंत्रणेचा गैरवापर होत असल्याची गंभीर तक्रार या शिष्टमंडळाने राष्ट्रपतींकडे केली आहे.
भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना राघव चढ्ढा यांनी ‘आप’ सरकारवर कडाडून टीका केली. ज्या खासदारांनी अलीकडेच आम आदमी पार्टी सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे, त्यांना लक्ष्य करण्यासाठी पंजाब सरकार सूडबुद्धीने राज्य यंत्रणेचा वापर करत असल्याचा आरोप त्यांनी केला. पंजाब सरकार आणि आम आदमी पार्टी सुडाच्या भावनेने ‘व्हेनडेटा पॉलिटिक्स’ (राजकीय सूड) करत असल्याचे त्यांनी राष्ट्रपतींच्या निदर्शनास आणून दिले.
या घडामोडींमुळे पंजाबमधील लोकशाही धोक्यात येत असल्याची चिंता खासदारांनी व्यक्त केली असून, याप्रकरणी राष्ट्रपतींनी गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी विनंती करण्यात आली आहे. ‘आप’मधून भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांवर पंजाब पोलिसांमार्फत करण्यात येणाऱ्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

