
गया/नवी दिल्ली (pragatbharat.com) : व्हिएतनामचे नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष टो लॅम आज तीन दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी बिहारमधील गया येथे दाखल होत आहेत. राष्ट्राध्यक्षपदी निवड झाल्यानंतरचा हा त्यांचा पहिलाच भारत दौरा असून, त्यांच्यासोबत एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ आणि व्यापारी प्रतिनिधीही भारतात येत आहेत.
गया येथील भेटीनंतर ते नवी दिल्लीकडे रवाना होतील, जिथे उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत द्विपक्षीय संबंध, प्रादेशिक सुरक्षा आणि जागतिक मुद्द्यांवर सविस्तर चर्चा होणार आहे. तसेच, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचीही ते भेट घेणार आहेत. विशेष म्हणजे, भारत आणि व्हिएतनाम यांच्यातील संबंधांना ‘सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी’ (Comprehensive Strategic Partnership) मध्ये रूपांतरित झाल्याला १० वर्षे पूर्ण होत आहेत, त्या पार्श्वभूमीवर हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
आपल्या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात, गुरुवारी राष्ट्राध्यक्ष टो लॅम मुंबईला भेट देणार आहेत. या दौऱ्यामुळे आग्नेय आशियाई देशांसोबतचे भारताचे संबंध अधिक दृढ होतील आणि व्यापार, संरक्षण तसेच सांस्कृतिक क्षेत्रात सहकार्याच्या नवीन संधी उपलब्ध होतील, असा विश्वास परराष्ट्र मंत्रालयाने व्यक्त केला आहे.

