
गोंदिया/हिंगोली (pragatbharat.com) : महाराष्ट्रातील वातावरणात सध्या विचित्र टोकाचे बदल पाहायला मिळत आहेत. एका बाजूला तापमानाचा पारा ४० अंशांच्या पुढे गेल्याने नागरिक उन्हाच्या चटक्याने होरपळत आहेत, तर दुसरीकडे राज्याच्या विविध भागांत अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे बळीराजा मोठ्या संकटात सापडला आहे.
गोंदियात भात शेतीला मोठा फटका: गोंदिया जिल्ह्यात काल झालेल्या वादळी पाऊस आणि गारांमुळे उन्हाळी भात पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील तिरोडा, गोरेगाव, आमगाव आणि सडक अर्जुनी या तालुक्यांमध्ये कापणीला आलेला भात जमीनदोस्त झाला आहे. कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार, जिल्ह्यातील १२९ गावांमधील सुमारे १३८० हेक्टर शेतजमीन बाधित झाली आहे. भातासह मका आणि आंब्याच्या बागांचेही मोठे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांनी तातडीने पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी केली आहे.
हिंगोलीत बाजार समितीच्या निष्काळजीपणामुळे हळद भिजली: हिंगोली शहरासह जिल्ह्यातही अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. मात्र, बाजार समितीच्या नियोजनशून्य कारभारामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. मार्केटमध्ये विक्रीसाठी आणलेली शेकडो क्विंटल हळद उघड्यावर असल्याने भिजली आहे. लिलावापूर्वीच हळद भिजल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, बाजार समिती प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त केला जात आहे.
विद्युत पुरवठा खंडित आणि जनजीवन विस्कळीत: गोंदिया, गोरेगाव, देवरी आणि सालेकसा तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. विद्युत तारा तुटल्याने अनेक भागांतील विद्युत पुरवठा रात्रभर खंडित होता. दिवसभर कडक ऊन आणि दुपारनंतर ढगांच्या गडगडाटासह येणारा पाऊस, अशा दुहेरी संकटामुळे शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत.

