
नवी दिल्ली (pragatbharat.com) : भारतीय हवामान विभागाने (IMD) देशातील विविध राज्यांमध्ये येत्या दोन दिवसांत हवामानात मोठ्या बदलाचा अंदाज वर्तवला आहे. ईशान्य कडील राज्यांसह दक्षिण भारतातील तामिळनाडू आणि केरळमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच काही राज्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आला असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मुसळधार पावसाचा अंदाज: हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आसाम, मेघालय, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा या ईशान्येकडील राज्यांमध्ये पुढील दोन दिवस जोरदार पाऊस पडू शकतो. याचबरोबर, हिमालयीन पश्चिम बंगाल, केरळ, माहे, तामिळनाडू, पुडुचेरी आणि कराईकल या भागातही पावसाची शक्यता आहे. मान्सून पूर्व हालचालींमुळे हा बदल होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
वादळ आणि विजांचा कडकडाट: पावसासोबतच देशाच्या मध्य आणि पूर्व भागात वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आला आहे. बिहार, छत्तीसगड, किनारपट्टीचा आंध्र प्रदेश, पूर्व राजस्थान, जम्मू-काश्मीर, लडाख, झारखंड, मध्य प्रदेश, ओडिसा आणि पश्चिम बंगालमध्ये विजांच्या कडकडाटासह वेगवान वारे वाहण्याची शक्यता आहे. अशा वेळी नागरिकांनी झाडाखाली किंवा मोकळ्या जागेत थांबणे टाळावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
उष्णतेची लाट कायम: एकीकडे पावसाचा इशारा असताना दुसरीकडे दक्षिण भारतात उष्णतेचा कडाका कायम राहणार आहे. आंध्र प्रदेश, किनारपट्टीचा कर्नाटक, तामिळनाडू आणि पुडुचेरीमध्ये उद्यापर्यंत हवामान अत्यंत उष्ण आणि दमट राहण्याची शक्यता आहे. वाढत्या तापमानामुळे नागरिकांनी दुपारच्या वेळी बाहेर पडताना काळजी घ्यावी आणि जास्तीत जास्त पाण्याचे सेवन करावे, असा सल्ला प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

