चंद्रपुरात थरकाप! जंगलात तेंदूपाने तोडणाऱ्या महिलांवर वाघिणीचा हल्ला; ४ महिला जागीच ठार, परिसरात तीव्र संताप

चंद्रपूर/सिंदेवाही (pragatbharat.com) : चंद्रपूर जिल्ह्यातून मानव-वन्यजीव संघर्षाची एक अत्यंत विदारक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही-पवानपार परिसरातील जंगलात तेंदूपाने (तेंदुपत्ता) तोडण्यासाठी गेलेल्या १३ महिलांच्या घोळक्यावर दबा धरून बसलेल्या वाघिणीने भीषण हल्ला केला. या हल्ल्यात ४ महिलांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला असून, राज्यात एकाच वेळी वाघाच्या हल्ल्यात चार जणांचा बळी गेल्याची ही पहिलीच घटना असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मृतांची नावे व गावातील शोककळा: सर्व मृत महिला गुंजेवाही गावातील भट्टी मोहल्ला (वॉर्ड क्र. १) येथील रहिवासी आहेत. मृतांमध्ये कविता दादाजी मोहुर्ले (४५), अनिता दादाजी मोहुर्ले (४६), संगीता संतोष चौधरी (४०) आणि सुनीता कौशिक मोहुर्ले (३५) यांचा समावेश आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावात तीव्र संताप आणि दुःखाचे वातावरण असून, संतप्त ग्रामस्थांनी वन विभागाच्या कारभारावर तीव्र आक्षेप घेतला आहे. घटनेची माहिती मिळताच वन विभाग आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.

भंडाऱ्यातही वाघाचा वावर; नागरिकांमध्ये दहशत: दुसरीकडे, भंडाऱ्याच्या जवाहरनगर येथील आयुध निर्माणी (ऑर्डनन्स फॅक्टरी) परिसरात भरदिवसा वाघाचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सध्या विदर्भात तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या पार गेल्याने, कडक उन्हापासून सुटका मिळवण्यासाठी हा वाघ एका पाण्याच्या स्रोतापाशी आराम करताना नागरिकांना दिसला. हा परिसर नेहमीच वर्दळीचा असल्याने वन विभागाने तात्काळ गस्त वाढवावी, अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *