
मुंबई (pragatbharat.com) : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून मुंबईत सुरुवात झाली आहे. जनता आणि विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याची मुख्य जबाबदारी सत्ताधाऱ्यांची असताना, अलिकडच्या काळात मंत्र्यांच्या अनुपस्थितीमुळे सभागृहाचे कामकाज वारंवार तहकूब करावे लागत आहे. या सर्व प्रकारावर कमालीची नाराजी व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याच मंत्र्यांना अत्यंत कडक शब्दांत तंबी दिली असून, अधिवेशनाकडे दुर्लक्ष करणाऱ्या मंत्र्यांची नावे जाहीर करण्याचा थेट इशारा दिला आहे.
मंत्र्यांच्या बेफिकीरीमुळे सरकारची नामुष्की: सभागृहात स्वतःच्या खात्याशी संबंधित विषयांवर चर्चा सुरू असतानाही अनेक मंत्री सभागृहात उपस्थित न राहता आपल्या दालनात बैठका घेण्यात व्यस्त असतात, अशा तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. मंत्र्यांच्या या अनुपस्थितीमुळे अनेकदा विरोधक आक्रमक होतात आणि पीठासीन अधिकाऱ्यांवर कामकाज तहकूब करण्याची वेळ येते. यामुळे होणारी नामुष्की टाळण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा संसदीय कार्यमंत्र्यांना सभागृहात वारंवार दिलगिरी व्यक्त करावी लागते. हीच बाब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी मोठी डोकेदुखी ठरली आहे.
मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांची नामी शक्कल आणि कडक आदेश: अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या महत्त्वपूर्ण मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांची चांगलीच शाळा घेतली. त्यांनी मंत्र्यांसाठी खालीलप्रमाणे कडक नियमावली जारी केली आहे: १. गैरहजेरी अजिबात खपवून घेतली जाणार नाही: दोन्ही सभागृहांच्या कामकाजादरम्यान कोणत्या मंत्र्याने कुठे उपस्थित राहावे, याच वेळापत्रक दिले जाईल आणि त्याचे काटेकोर पालन करावे लागेल. २. बैठका कामकाज संपल्यावरच घ्या: मंत्रालयातील किंवा दालनातील सर्व बैठका आणि ब्रीफिंग हे विधिमंडळाचे दैनिक कामकाज संपल्यानंतरच घ्यावे. ३. सहन केले जाणार नाही: मंत्र्यांच्या अनुपस्थितीमुळे जर सदनाचे कामकाज बंद पडले, तर ते खपवून घेतले जाणार नाही.
अधिवेशनाच्या शेवटी गैरहजर मंत्र्यांची यादी होणार जाहीर: मंत्र्यांच्या वर्तणुकीत सुधारणा व्हावी यासाठी मुख्यमंत्र्यांनी यंदा एक नामी शक्कल लढवली आहे. “यंदा अधिवेशनाच्या अखेरीस कोणत्या मंत्र्यांच्या गैरहजेरीमुळे सभागृहाचा किती वेळ वाया गेला, याची अधिकृत आकडेवारी जाहीर करण्यास पीठासीन अधिकाऱ्यांना सांगितले जाईल,” असा थेट इशारा फडणवीस यांनी दिला आहे. मुख्यमंत्र्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे आता मंत्र्यांचे धाबे दणाणले असून, चालू अधिवेशनात मंत्र्यांची उपस्थिती कशी राहते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


