
मुंबई (pragatbharat.com) : हिंदी चित्रपटसृष्टीतील ६० आणि ७० चे दशक हे संगीताचा सुवर्णकाळ मानले जाते. त्या काळातील गाणी केवळ मनोरंजनाचे साधन नव्हती, तर ती मनाच्या कोपऱ्यात कायमचे घर करून राहणारी ठरली. साधे शब्द, मधुर चाली आणि हृदयाला स्पर्श करणाऱ्या संगीतामुळे जुनी गाणी आजही सदाबहार वाटतात. अशाच सदाबहार आणि पावसाच्या पार्श्वभूमीवर चित्रित झालेल्या एका प्रचंड रोमँटिक गाण्याने तब्बल ५७ वर्षांनंतरही रसिकांच्या मनावर आपले गारुड कायम ठेवले आहे. ते गाणे म्हणजे ‘दो रास्ते’ चित्रपटातील ‘छुप गए सारे नज़ारे’!
१९६९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दो रास्ते’ या चित्रपटातील ४ मिनिटे ४७ सेकंदांचे हे गाणे आजही संगीतप्रेमींमध्ये तितकेच लोकप्रिय आहे. “छुप गए सारे नजारे, क्या बात हो गई… तूने काजल लगाया, दिन में रात हो गई…” या ओळी कानावर पडताच आजही जुन्या आठवणी ताज्या होतात आणि लोक दिवसभर हे गाणे गुणगुणत राहतात. आधुनिक तंत्रज्ञानाचा कोणताही अतिरेक नसतानाही केवळ साधेपणा आणि मधुरतेच्या जोरावर या गाण्याने इतिहास रचला.
राजेश खन्ना आणि मुमताज यांची अजरामर केमिस्ट्री या गाण्याचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार राजेश खन्ना आणि एव्हरग्रीन अभिनेत्री मुमताज यांची पडद्यावरील अप्रतिम केमिस्ट्री! पावसात चित्रित झालेल्या या गाण्यातील मुमताज यांच्या कातिल अदा आणि राजेश खन्ना यांची रोमँटिक स्टाईल पाहून तत्कालीन प्रेक्षक वेडे झाले होते. आनंद बक्षी यांचे अप्रतिम शब्द आणि लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांच्या सुमधुर संगीताने सजलेले हे गाणे मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांनी आपल्या सुश्राव्य आवाजाने अजरामर केले आहे.
अनेक दशके उलटून गेल्यानंतरही या गाण्याची जादू तसूभरही कमी झालेली नाही. आजच्या डिजिटल युगातही विविध म्युझिक शो, रिअॅलिटी शो आणि सोशल मीडियावर या गाण्याचे रील्स, शॉर्ट्स मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतात. पिढ्या बदलल्या तरी साचेबद्ध संगीताला बाजूला सारत हे गाणे आजही प्रेमाचे प्रतीक मानले जाते.



