
मुंबई (pragatbharat.com) : बॉलिवूड आणि छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy) सध्या तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. मौनी आणि तिचे पती सूरज नांबियार यांच्यात सर्व काही सुरळीत सुरू नसल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत. या दोघांनीही इन्स्टाग्रामवर एकमेकांना ‘अनफॉलो’ (Unfollow) केल्याचे नेटकऱ्यांच्या निदर्शनास आले असून, तेव्हापासून त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आले आहे.
मौनी रॉयने २०२२ मध्ये दुबईतील उद्योजक सूरज नांबियारसोबत मोठ्या थाटामाटात लग्न केले होते. मात्र, आता दोघांनी एकमेकांना अनफॉलो केल्याने चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. काही सोशल मीडिया युजर्सनी असाही दावा केला आहे की, त्यांनी एकमेकांसोबतचे काही फोटोही डिलीट केले आहेत. मात्र, अद्याप मौनीच्या अकाऊंटवर लग्नाचे आणि काही जुने फोटो दिसत आहेत. ऑगस्ट २०२४ पासून या दोघांचाही कोणताही नवीन फोटो समोर आलेला नाही, ज्यामुळे संशयाची पाल अधिकच चुकचुकत आहे.
चित्रपटसृष्टीत सध्या घटस्फोटांचे सत्र सुरू असताना मौनी रॉयच्या या कृतीने चाहत्यांना धक्का बसला आहे. या प्रकरणावर अद्याप मौनी किंवा सूरज यांच्याकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. ‘नागिन’ फेम मौनीने ‘ब्रह्मास्त्र’ सारख्या मोठ्या सिनेमांतून आपली ओळख निर्माण केली आहे, त्यामुळे तिच्या वैयक्तिक आयुष्यातील या घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

