
सातारा/सांगली (pragatbharat.com) : सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीचा (Vidhan Parishad Election 2026) राजकीय आखाडा आता चांगलाच तापू लागला आहे. महायुतीने उमेदवारी जाहीर करताना साताऱ्याच्या दोन्ही राजांना (खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले) विश्वासात घेतले नसल्याचा दावा करत राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी राजांच्या स्वाभिमानाचा मुद्दा उपस्थित केला होता. जयंत पाटलांच्या या विधानाचा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आज अत्यंत शेलक्या आणि खोचक शब्दांत समाचार घेतला. “जयंत पाटील यांनी काय बोलावं हा त्यांचा वैयक्तिक विषय आहे. पण मी जर उद्या त्यांना त्यांच्या हक्काच्या घरातच कोणी विचारत नाही, असे म्हटले तर त्यांना कसे चालेल?” अशा कडक शब्दांत गोरेंनी पाटलांची टोलेबाजी केली आहे.
“दोन्ही राजांनी फ्रंट फुटवर येऊन निवडणूक हाताळली” प्रसारमाध्यमांशी बोलताना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी महायुतीत कोणताही समन्वय नसल्याचा विरोधकांचा दावा पूर्णपणे फेटाळून लावला. ते म्हणाले, “सांगली-सातारा विधान परिषदेसाठी महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून धैर्यशील कदम यांची उमेदवारी पक्षाने आणि स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली आहे. आम्ही सर्वांनी ती अत्यंत आनंदाने स्वीकारली आहे. मी इतर कामांत अडकलेलो असताना साताऱ्याच्या दोन्ही राजांनी स्वतः ‘फ्रंट फुट’वर येऊन ही निवडणूक अत्यंत जबाबदारीने हाताळली आहे. विरोधकांचे काम केवळ महायुतीत कुठे फट किंवा फूट पडतेय का, हे शोधणे एवढेच असते. जयंत पाटील हे कसलेले राजकारणी आहेत, त्यामुळे ते अशी विधाने करून केवळ संभ्रम निर्माण करत आहेत.” सातारकरांनी आपला स्वाभिमान काय आहे ते मतदानातून दाखवून द्यावे, या जयंत पाटलांच्या आवाहनाला गोरेंनी हे सडेतोड उत्तर दिले.
“रोहित पवारांचे आंदोलन म्हणजे केवळ स्टंट आणि नौटंकी” याच पत्रकार परिषदेत जयकुमार गोरे यांनी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून पंढरपुरात अन्नत्याग आंदोलन पुकारणारे आमदार रोहित पवार यांच्यावरही जोरदार निशाणा साधला. महायुती सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना ऐतिहासिक कर्जमाफी दिली आहे, याबद्दल रोहित पवारांनी खरं तर सरकारचे अभिनंदन करायला हवे होते. मात्र, केवळ राजकीय स्वार्थापोटी ते १२ जून (शुक्रवार) पासून पंढरपुरात आंदोलन करत आहेत. रोहित पवारांचे हे आंदोलन म्हणजे केवळ ‘स्टंटबाजी’ आणि ‘नौटंकी’ आहे, अशी घणाघाती टीका गोरे यांनी यावेळी केली. सांगली-सातारा निवडणुकीच्या निमित्ताने पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय संघर्ष आता टोकाला पोहोचल्याचे या आरोप-प्रत्यारोपांवरून स्पष्ट होत आहे.


