
नवी दिल्ली (pragatbharat.com) : पश्चिम बंगालच्या राजकारणातून अत्यंत खळबळजनक आणि देशाच्या राजकारणाला कलाटणी देणारी मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस (TMC) पक्षाला आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का बसला असून पक्षातील तब्बल २० बंडखोर खासदारांनी ‘नॅशनलिस्ट सिटिझन्स पार्टी ऑफ इंडिया’ (NCPI) मध्ये विलीन होण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. हे सर्व खासदार केंद्रातील सत्ताधारी एनडीए (NDA) आघाडीला पाठिंबा देणार असल्याने देशातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलणार आहेत.
भूपेंद्र यादव यांच्या निवासस्थानी खलबते आणि लोकसभा अध्यक्षांची भेट: या मोठ्या राजकीय भूकंपाची पाळेमुळे आज दिल्लीत रचली गेली. तृणमूल काँग्रेसच्या २० बंडखोर खासदारांची आज केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्या निवासस्थानी एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीनंतर खासदार काकोली घोष दस्तीदार, सुदीप बंद्योपाध्याय आणि शताब्दी रॉय यांच्या नेतृत्वाखालील या गटाने थेट लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. खासदारांच्या या गटासोबत भाजपचे खासदार निशिकांत दुबे हे देखील उपस्थित होते.
पक्षांतर बंदी कायद्यातून बचावासाठी दोन-तृतीयांश बहुमताचा दावा: लोकसभा अध्यक्षांच्या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना खासदार काकोली घोष दस्तीदार यांनी सांगितले की, “आम्ही २० खासदारांनी लोकसभा अध्यक्षांना भेटून स्वतंत्र गट म्हणून मान्यता देणारे पत्र सुपूर्द केले आहे. आमची संख्या टीएमसीच्या एकूण खासदार संख्येच्या दोन-तृतीयांशपेक्षा जास्त असल्याने आमच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकत नाही. आम्ही सर्वजण देशाच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएसोबत काम करणार आहोत.”
NCPI मध्ये विलीनीकरण आणि ‘खऱ्या’ टीएमसीवर दावा: बंडखोर नेते सुदीप बंद्योपाध्याय यांनी स्पष्ट केले की, आसाम, त्रिपुरा, पश्चिम बंगाल आणि ईशान्य भारतात सक्रिय असलेल्या ‘नॅशनलिस्ट सिटिझन्स पार्टी ऑफ इंडिया’ (NCPI) मध्ये आम्ही विलीन होत आहोत. २० जुलैपूर्वी आमच्या गटाला संसदेत स्वतंत्र कार्यालय आणि मान्यता मिळेल. त्यानंतर ‘खरी तृणमूल काँग्रेस’ कोणाची, याचा अंतिम निर्णय न्यायालयात घेतला जाईल, असे सांगत त्यांनी ममता बॅनर्जी यांना थेट आव्हान दिले आहे.
बंडखोर गटात ‘या’ दिग्गज खासदारांचा समावेश: आज लोकसभा अध्यक्षांची भेट घेणाऱ्या प्रमुख बंडखोर खासदारांमध्ये काकोली घोष दस्तीदार, शताब्दी रॉय, सुदीप बॅनर्जी यांच्यासह सयानी घोष, माला रॉय, अरूप चक्रवर्ती, घाटलचे प्रसिद्ध अभिनेते आणि खासदार दीपक अधिकारी (देव), माजी क्रिकेटपटू व खासदार युसूफ पठाण, जून माल्या, प्रसून बॅनर्जी, शर्मिला सरकार, मिताली बाग, अबू ताहिर आणि खलिलुर रहमान यांसारख्या बड्या चेहऱ्यांचा समावेश आहे.


