
मुंबई (pragatbharat.com) : ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर पार पडलेल्या ‘टी-२० मुंबई लीग’ च्या अंतिम सामन्यात मुंबई साऊथ सेंट्रल मराठा रॉयल्स (MSCMR) संघाने अप्रतिम अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर सलग दुसऱ्यांदा जेतेपदावर आपले नाव कोरले आहे. एका अटीतटीच्या आणि थरारक सामन्यात मराठा रॉयल्सने शिवम दुबेच्या नेतृत्वाखालील आर्क्स अंधेरी (AA) संघाचा ८ धावांनी पराभव केला. या विजयानंतर संघाचा मुख्य वेगवान गोलंदाज तुषार देशपांडे याने आपल्या गोलंदाजीच्या रणनीतीबद्दल एक मोठा खुलासा केला आहे.
चिन्मय सुतारची वादळी खेळी आणि फिरकीपटूंची कमाल: मराठा रॉयल्सने प्रथम फलंदाजी करताना फिरकीला अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर १५४-५ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. यामध्ये चौथ्या क्रमांकावर आलेल्या चिन्मय सुतारने पुन्हा एकदा संकटमोचकाची भूमिका बजावत ६१ धावांची झुंजार खेळी केली. (गेल्या वर्षीच्या अंतिम सामन्यातही सोबो मुंबई फाल्कन्सविरुद्ध नाबाद ५० धावा करत त्याने संघाला विजय मिळवून दिला होता). या आव्हानाचा पाठलाग करताना आर्क्स अंधेरीचा संघ १४६-८ धावांवरच रोखला गेला.
“मी स्वतःला शिवम दुबेसाठी राखून ठेवले होते” – तुषार देशपांडे: जोपर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू शिवम दुबे मैदानावर होता, तोपर्यंत आर्क्स अंधेरीच्या विजयाच्या आशा जिवंत होत्या. मात्र, अत्यंत मोक्याच्या क्षणी अनुभवी वेगवान गोलंदाज तुषार देशपांडेने डावातील महत्त्वाचे षटक टाकत शिवम दुबेला (१५ धावा) सीमारेषेवर झेलबाद केले. अंधेरीला विजयासाठी अवघ्या २५ धावांची गरज असताना दुबे बाद झाला आणि सामन्याचे पारडे फिरले.
सामन्यानंतर बोलताना २-३३ अशी कामगिरी करणाऱ्या तुषार देशपांडेने सांगितले की, “खेळपट्टी फिरकीपटूंना मदत करत होती आणि आमच्या फिरकीपटूंनी संपूर्ण स्पर्धेत अप्रतिम कामगिरी केली आहे. मी शेवटच्या षटकांमध्ये शिवम दुबेला रोखण्यासाठी आणि त्याला बाद करण्यासाठी स्वतःची षटके राखून ठेवली होती, आणि आमची ही रणनीती अगदी अचूक ठरली.”
मैदानातील वाद हा खेळाचाच एक भाग: सामन्यादरम्यान अंधेरीचा फलंदाज गौरव जठार बाद झाल्यानंतर दोन्ही संघांतील खेळाडूंमध्ये काही काळ शाब्दिक चकमक उडाली होती आणि मैदानातील वातावरण तापले होते. या वादावर प्रतिक्रिया देताना देशपांडेने अत्यंत समजूतदारपणे सांगितले की, “अंतिम सामन्यात अशा प्रकारचा उत्साह आणि तणाव असणे साहजिक आहे, हा केवळ खेळाचाच एक भाग (Part of the game) आहे.”


