[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
नवी दिल्ली : संसदेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन आज वेदमंत्रांच्या घोषात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं. मात्र एकीकडे हा सोहळा रंगत असताना दुसरीकडे या नव्या संसदेपासून काही किलोमीटर असलेल्या जंतर-मंतर मैदानावर आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करत असलेल्या ऑलिम्पिक पदक विजेत्या महिला खेळाडूंना पोलिसी कारवाईला तोंड द्यावं लागलं. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांच्यावर महिला खेळाडूंनी लैंगिक शोषणाचे आरोप करून त्यांना पदावरून हटवावे, यासाठी मागील महिनाभरापासून आंदोलन सुरू केलं आहे. नव्या संसदेचं उद्घाटन होत असताना आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचं सांगत या खेळाडूंकडून जंतर-मंतरवरून कूच करत आज संसदेसमोर ‘महापंचायत’ भरवण्यात येणार होती. मात्र तत्पूर्वीच पोलिसांनी बळाचा वापर करत अनेक खेळाडूंना ताब्यात घेतलं आहे.जंतर-मंतर मैदानातून संसदेच्या दिशेने कूच करण्याच्या प्रयत्नात असलेले मल्ल साक्षी मलिक, विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांच्यासह त्यांच्या इतर साथीदारांना पोलिसांनी फरफरट नेत जबरदस्ती आपल्या वाहनात बसवलं. एकीकडे खेळाडूंवर अटकेची कारवाई होत असताना दुसरीकडे आंदोलनास्थळावरील खेळाडूंच्या गाद्या, पंखे आणि इतर साहित्यही पोलिसांनी हटवलं. त्यामुळे या खेळाडूंना पुन्हा जंतर-मंतरवर आंदोलनासाठी बसता येऊ नये, अशी व्यवस्था तर पोलिसांकडून केली जात नाही ना, असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे.
साक्षी मलिक आणि विनेश फोगट यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या खेळातून प्रत्येक भारतीयाची छाती अभिमाने फुलवली. याच खेळाडूंवर पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनीही आपला रोष व्यक्त केला आहे. ‘राज्याभिषेक पूर्ण झाला आणि अहंकारी राजा जनतेचा आवाज रस्त्यावर चिरडत आहे,’ असं ट्वीट करत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी खेळाडूंवरील कारवाईवरून पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे.
दुसरीकडे, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही ट्वीट करत खेळाडूंवरील कारवाईचा निषेध केला आहे. ‘देशाचा सन्मान वाढवाऱ्या आपल्या खेळाडूंना दिलेली ही वागणूक खूपच चुकीची आणि निषेधार्ह आहे,’ असं केजरीवाल यांनी म्हटलं आहे.
[ad_2]