हातातून गेलेला सामना भारताने कसा जिंकला? थरारक विजयानंतर कर्णधार तिलक वर्माने सांगितला टर्निंग पॉईंट

कोलंबो (pragatbharat.com) : श्रीलंका, भारत आणि अफगाणिस्तान ‘अ’ संघांदरम्यान सुरू असलेल्या तिरंगी एकदिवसीय मालिकेतील (Tri-Series) पहिल्याच सामन्यात कमालीचा थरार पाहायला मिळाला. भारत ‘अ’ संघाने (India A) शेवटच्या षटकांमध्ये जबरदस्त गोलंदाजीच्या जोरावर श्रीलंका ‘अ’ संघाच्या तोंडातून विजयाचा घास हिरावून घेत ऐतिहासिक विजय मिळवला. १८ चेंडूंत अवघ्या १७ धावांची गरज असताना श्रीलंकेने अवघ्या ८ धावांत ४ विकेट्स गमावल्या आणि भारताने अटीतटीचा सामना खिशात घातला. या थरारक विजयानंतर भारताचा कर्णधार तिलक वर्मा याने सामन्यानंतर प्रतिक्रिया देत विजयाचे रहस्य सांगितले.

४८ आणि ४९ व्या षटकातील तो ‘चमत्कार’ सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ६ गड्यांच्या मोबदल्यात २७७ धावा केल्या होत्या आणि श्रीलंकेसमोर २७८ धावांचे आव्हान ठेवले होते. श्रीलंकेच्या फलंदाजांनी उत्कृष्ट सुरुवात केल्यामुळे सामना भारताच्या हातातून गेला असे वाटत होते. मात्र, ४८ व्या आणि ४९ व्या षटकात सामन्याचे चित्र पूर्णपणे पलटले. टर्निंग पॉईंटबद्दल बोलताना तिलक वर्मा म्हणाला, “श्रीलंकेचा साहन ज्या प्रकारे फलंदाजी करत होता, ती आमच्यासाठी धोक्याची घंटा होती. पण अंशुल कंबोजने टाकलेल्या त्या अचूक यॉर्करवर साहन बाद झाला आणि तिथेच सामन्याला खरी कलाटणी मिळाली. अर्शद खान आणि अंशुल कंबोज या आमच्या सलामीच्या गोलंदाजांनी सुरुवातीला महागडी गोलंदाजी केली असली, तरी ज्या प्रकारे त्यांनी अखेरच्या ओव्हर्समध्ये सामना संपवला ते अद्भूत होते.”

खेळपट्टी आणि पुढील सामन्यांचे आव्हान खेळपट्टीच्या स्वरूपाविषयी बोलताना तिलक म्हणाला, “दुसऱ्या डावात खेळपट्टी अधिक संथ होईल असा आमचा अंदाज होता, परंतु खेळपट्टी फारशी बदलली नाही. फलंदाजीसाठी २७० हून अधिक धावा सन्मानजनक होत्या. मात्र, आम्ही आता आमच्या रणनीतीवर नव्याने विचार करू. पुढील सामन्यांमध्ये अचूक टप्प्यावर गोलंदाजी कशी करता येईल, यावर आमचा भर असेल.”

तिलक वर्माने प्रतिस्पर्धी संघांचे कौतुक करताना सांगितले की, श्रीलंकेच्या भूमीवर श्रीलंका आणि अफगाणिस्तानसारख्या दर्जेदार संघांविरुद्ध खेळणे नेहमीच आव्हानात्मक असते. यापूर्वीच्या मालिकेत श्रीलंकेने आपला पराभव केला होता, त्यामुळे ही स्पर्धा किती चुरशीची असेल याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे. आम्ही त्यासाठी योग्य तयारी केली असून, मालिकेची सुरुवात विजयाने झाली याचा विशेष आनंद आहे, असा विश्वास त्याने व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *