
मुंबई (pragatbharat.com) : भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) यांच्यात सुरू होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी भारतीय क्रिकेट संघाला एक मोठा झटका बसला आहे. टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या हा घोट्याच्या दुखापतीमुळे या आगामी मालिकेतून अधिकृतपणे बाहेर पडला आहे. विशेष म्हणजे, राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (NCA) फिटनेस चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर अवघ्या एका दिवसातच हार्दिकला दुखापत झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
पाय मुरगळल्याने पुनरागमनाची संधी हुकली ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने (TOI) दिलेल्या वृत्तानुसार, सराव सत्रादरम्यान हार्दिक पांड्याचा पाय अचानक मुरगळला असून त्याच्या घोट्याला ‘लो-ग्रेड’ (सौम्य स्वरूपाची) दुखापत (Sprain) झाली आहे. ही दुखापत फारशी गंभीर नसली, तरी आगामी मोठ्या स्पर्धा पाहता ती अधिक बळावू नये म्हणून बीसीसीआयच्या (BCCI) वैद्यकीय पथकाने त्याला पुढील दोन आठवडे पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. यामुळे हार्दिकला आता बेंगळुरू येथील बीसीसीआयच्या ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’मध्ये (NCA) आणखी काही दिवस पुनर्वसनासाठी (Rehab) घालवावे लागणार आहेत. या दुखापतीमुळे त्याचे तब्बल १४ महिन्यांनंतर एकदिवसीय संघात होणारे पुनरागमन हुकले आहे.
१३ जूनपासून मालिकेचा थरार; धर्मशाला येथे पहिला सामना भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका येत्या १३ जून २०२६ पासून सुरू होणार आहे. मालिकेतील पहिला सामना धर्मशाला येथील मैदानावर खेळवला जाईल. त्यानंतर दोन्ही संघ १७ जून रोजी दुसऱ्या सामन्यासाठी लखनऊला रवाना होतील, तर तिसरी आणि अंतिम वनडे मॅच २० जून रोजी चेन्नई येथे खेळवली जाणार आहे. ११ जून रोजी हार्दिक संघासोबत जोडला जाणार होता, परंतु आता तो थेट मालिकेतूनच बाहेर झाल्याने बीसीसीआय त्याच्या जागी कोणत्या अष्टपैलू खेळाडूला संधी देते, याकडे निवड समिती आणि क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.


