
मुंबई (pragatbharat.com) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्राच्या शैक्षणिक आणि तांत्रिक भविष्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. राज्याने आपले स्वतंत्र ‘कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण २०२६’ (AI Policy 2026) मंजूर केले असून, याद्वारे २०२१ पर्यंत १.५ लाख नोकऱ्यांच्या निर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
या धोरणांतर्गत राज्यात सहा ‘एआय सेंटर ऑफ एक्सलन्स’ आणि पाच ‘एआय इनोव्हेशन शहरे’ स्थापन केली जाणार आहेत. या निर्णयामुळे तंत्रज्ञान क्षेत्रात महाराष्ट्राचे स्थान अधिक बळकट होणार आहे. तसेच, शिक्षण क्षेत्राला चालना देण्यासाठी सोलापूर येथे नवीन शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या महाविद्यालयात प्रामुख्याने एआय, मशीन लर्निंग आणि डेटा सायन्स यांसारखे आधुनिक अभ्यासक्रम शिकवले जातील.
याशिवाय, तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय आता राज्य शासनाकडे हस्तांतरित करण्यात आले असून, त्याचे नाव ‘शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, तुळजापूर’ असे करण्यात आले आहे. आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी ५ प्राथमिक आश्रमशाळांचे माध्यमिक स्तरावर आणि १९ माध्यमिक शाळांचे उच्च माध्यमिक स्तरावर श्रेणीवर्धन करण्याचा ऐतिहासिक निर्णयही मंत्रिमंडळाने घेतला आहे. या सर्व निर्णयांसाठी कोट्यवधी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून, यामुळे दुर्गम भागातील विद्यार्थ्यांची गळती थांबण्यास मदत होणार आहे.

