[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
मुंबई : मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्याशी शरद पवार (Sharad Pawar) यांचा संपर्क नाही, त्यामुळे त्यांच्या आंदोलनामागे शरद पवार आहेत हा आरोप चुकीचा असल्याचं स्पष्टीकरण राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी दिलं. लोकसभा निवडणुकांच्या जागावाटपासंदर्भातला राज्यातील पेच लवकरात लवकर सोडवला जाईल, त्यासंदर्भात शरद पवार साहेब आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची फोनवरून चर्चा झाली आहे अशी माहिती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची आज महत्वपूर्ण बैठक पार पडली. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना महाराष्ट्रातल्या संघटनेबाबत चर्चा केली. लोकसभेच्या जागावाटपाच्या वृतांबाबत चर्चा झाली, राज्यात किती जागा जिंकू शकतो याची माहिती त्यांना दिली असे जयंत पाटील म्हणाले.मुंबई येथील पक्षाच्या मुख्य कार्यालयाबाहेर माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते.
मनोज जरांगे आणि शरद पवारांचा संपर्क नाही
शरद पवार हेच मनोज जरांगे यांच्या आंदोलनामागे असल्याचा आरोप आज संगीता वानखेडे यांनी केला. त्यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले की, मनोज जरांगे यांच्याशी कधीही आदरणीय शरद पवार साहेबांचा संपर्क आलेला नाही, त्यांचा संपर्क कोणाशी आहे? हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत असावे असा माझा अंदाज आहे. मुख्यमंत्री व मनोज जरांगे पाटील यांच्या संवादात कशामुळे विसंवाद तयार होतोय? याचा अभ्यास करून सरकारने अशी आंदोलने वारंवार होणार नाहीत याची जबाबदारीने काळजी घेतली पाहिजे अशी सूचना त्यांनी केली.
ड्रग्ज प्रकरणावरून राज्य सरकारवर टीका
महाविकास आघाडी सरकारच्या काळात ड्रग्सच्या घटना घडल्या त्यावेळी सरकारला जबाबदार ठरवण्यात आले. पुण्यात ज्यावेळी छापेमारीत ड्रग्सचे साठे सापडले आहेत त्यावेळी वर्णन काय तर पोलिसांनी अत्यंत चाणाक्षपणाने ड्रग्स पकडले. यावेळी सरकारची जबाबदारी नाही? आज महाराष्ट्रात ड्रग्सचा सूळसुळाट आहे, कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती मोठ्या प्रमाणात हाताबाहेर गेलेली आहे अशी टीका जयंत पाटील यांनी केली.
मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेल्या आंदोलनावर ते म्हणाले की, परीक्षेच्या दिवसांत विद्यार्थ्यांना परीक्षा स्थळापर्यंत पोहोचण्यास अडथळा येऊ नये यासाठी मनोज जरांगे यांना विनंती राहील की अशा प्रकारचे आंदोलन करताना काळजी घ्यावी.
मंत्र्यांमध्ये खर्च करण्याची स्पर्धा
मंत्र्यांच्या शासकीय बंगल्यांवर होणाऱ्या वारेमाप खर्चावर बोलताना ते म्हणाले की, सरकारला उत्पन्न मिळवण्याचे गांभीर्य नाही पण खर्च करण्यात स्पर्धा चालू आहे. कोणत्या मंत्र्याने काय करावं याच्यावर कोणाचेही नैतिक बंधन किंवा अंकुश राहिलेले नाही. त्यामुळे बंगल्यांवर फार मोठ्या प्रमाणात खर्च चालू आहेत, त्याचा हिशोब राज्याचे अर्थमंत्री देतील अशी आमची अपेक्षा आहे असा टोला त्यांनी लगावला.
माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्यावर झालेल्या ईडीच्या कारवाईबाबत बोलताना जयंत पाटील यांनी सरकारला टोला लगावला. ते म्हणाले की, सत्यपाल मलिक स्पष्टपणाने बोलले याची त्यांना शिक्षा मिळत आहे का? हे तपासावे लागेल.
ही बातमी वाचा:
अधिक पाहा..
[ad_2]