9 November In History On This Day Indian Government Get Control On Junagarh Riyasat Fall Of The Berlin Wall Dhondo Keshav Karve Death Anniversary

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

9 November In History : इतिहासात प्रत्येक दिवसाचे एक महत्त्व असते. आज 9 नोव्हेंबर रोजीदेखील काही महत्त्वाच्या ऐतिहासिक घडामोडी घडल्या आहेत. स्वातंत्र्यानंतर, जनमताला नाकारत पाकिस्तानमध्ये जाण्याचा निर्णय घेणाऱ्या जूनागड संस्थानाचा ताबा आजच्या दिवशी भारताने घेतला. तर, स्त्री शिक्षणाासाठी आणि विधवांच्या उन्नतीसाठी आपलं आयुष्य वेचणारे समाजसुधारक महर्षी धोंडो केशव कर्वे (Dhondo Keshav Karve) यांचा आज स्मृतीदिन आहे. जर्मनीची फाळणी करणाऱ्या बर्लिनची भिंत आजच्या दिवशी पाडण्यात आली.

1877 : ‘सारे जहाँ से अच्छा’ गीताचे कवी आणि तत्त्वज्ञ मुहम्मद इक्बाल यांचा जन्म

मोहम्मद इकबाल उर्फ अल्लामा इक्बाल हे उर्दू भाषेतील नामवंत कवी म्हणून ओळखले जातात. तसेच भारत आणि पाकिस्तान मधील महत्त्वाचे व्यक्तिमत्व होते. त्यांच्या कविता स्फुर्ती देणाऱ्या आहेत. ‘सारे जहॉं से अच्छा’ या लोकप्रिय गीताचे लेखन त्यांनी केले.  

मुहम्मद इक्बाल यांचा जन्म 9 नोव्हेंबर 1877 रोजी  सियालकोट येथे झाला. सियालकोट हा आता पाकिस्तानचा भाग आहे. मुहम्मद इक्बाल मसूदी हे अविभाजित भारताचे प्रसिद्ध कवी, नेते आणि तत्त्वज्ञ होते. उर्दू आणि पर्शियन भाषेतील त्यांची कविता आधुनिक काळातील सर्वोत्तम कवितांमध्ये गणली जाते. पर्शियन भाषेत लिहिलेली त्यांची कविता इराण आणि अफगाणिस्तानमध्ये खूप प्रसिद्ध आहे. 

 ‘सारे जहॉं से अच्छा’ सारखे गीत लिहिणारे इक्बाल यांनी बॅ. मोहम्मद अली जिना यांच्या नेतृत्त्वातील पाकिस्तानच्या निर्मितीसाठी सहभाग घेतला असल्याचे म्हटले जाते.  मुस्लिमांना वेगळे राष्ट्र मिळाल्याशिवाय त्यांचे धार्मिक हक्क अबाधित राहणार नाहीत या विचाराने तो प्रभावित झाले होते. त्यामुळे मुस्लिमांचे धार्मिक अबाधित असणारे राज्य असावे, या आशयाचे त्यांनी 1930 च्या सुमारास भाषण केले होते. त्यात पाकिस्तानचा उल्लेख नव्हता. पाकिस्तानची निर्मिती झाली तेव्हा ते हयात नव्हते. पाकिस्तानमध्ये त्यांना राष्ट्रकवीचा दर्जा आहे. 

1947 :  भारत सरकारने जूनागढ संस्थान बरखास्त करुन ताब्यात घेतले

जुनागड संस्थान हिंदुस्थानातील पश्चिमेला सौराष्ट्राचा समुद्र किनारा व इतर बाजूंना भारतीय भू असलेले, पाकिस्तानशी भौगोलिक सलगता नसणारे संस्थान होते. या संस्थानाच्या नबाबाने पाकिस्तानमध्ये विलीन होण्याची तयारी केली होती. 

15 ऑगस्ट 1947 रोजी नबाब महाबतखान याने जुनागड संस्थान पाकिस्तानमध्ये सामील होत असल्याचे जाहीर केले. बॅ. जीनांशी त्याने गुप्तपणे पत्रव्यवहार केला. पाकिस्तान सरकारने 13  सप्टेंबर 1947 जुनागड संस्थान पाकिस्तानात विलीन होत असल्याचे भारत सरकारला कळविले याबाबत जुनागडशी जैसे थे (स्‍टॅड स्टिल) करार झाल्याचे जाहीर केले. जुनागडमधील प्रजेने या निर्णयाला विरोध केला आणि त्यांनी नवाबाविरोधात आंदोलन सुरू केले. जुनागडमधील प्रजेने केलेल्या आंदोलनाला भारत सरकारने पाठिंबा दिला. जुनागडच्या आसपासची नवानगर, भावनगर, गोंडल ही संस्थाने यापूर्वीच भारतात सामील झाली होती. भारत सरकारने 24  सप्टेंबर 1947 रोजी जुनागडमध्ये लष्करी कारवाई केली. अखेर 9 नोव्हेंबर रोजी संपूर्ण जुनागड संस्थान भारताने आपल्या ताब्यात घेतले. पुढील काही महिन्यातच सार्वमत घेण्यात आले. 

1962 : भारतरत्न पुरस्कार विजेते धोंडो केशव कर्वे यांचे निधन

स्त्री शिक्षणाासाठी आणि विधवांच्या उन्नतीसाठी आपलं आयुष्य वेचणारे समाजसुधारक महर्षी धोंडो केशव कर्वे (Dhondo Keshav Karve) यांचा जन्म 18 एप्रिल 1858 रोजी झाला. महर्षी कर्वे यांनी आपले जीवन महिलांच्या उन्नतीसाठी समर्पित केले. त्यांनी मुंबईत स्थापन केलेले SNDT महिला विद्यापीठ हे भारतातील पहिले महिला विद्यापीठ आहे. 1891 ते 1914 पर्यंत ते पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात गणिताचे शिक्षक होते. सन 1915 मध्ये महर्षी कर्वे लिखित ‘आत्मचरित्र’ हे मराठी भाषेतील पुस्तक प्रकाशित झाले. 1942 मध्ये काशी हिंदू विद्यापीठाने त्यांना डॉ. लिट. पदवी देऊन त्यांचा सन्मान केला. 1954 मध्ये एसएनडीटी महिला विद्यापीठाने त्यांना LLD ची पदवी बहाल केली. सन 1955 मध्ये भारत सरकारने त्यांना “पद्मविभूषण” देऊन सन्मानित केले. वयाची 100 वर्षे पूर्ण झाल्यावर, 1957 मध्ये मुंबई विद्यापीठाने त्यांना एल.एल.डी. ची पदवी बहाल केली. 1958 मध्ये भारताच्या राष्ट्रपतींनी त्यांना देशाचा सर्वोच्च सन्मान “भारतरत्न” देऊन गौरवले. भारत सरकारच्या पोस्टल टेलिग्राफ विभागाने त्यांच्या सन्मानार्थ टपाल तिकीट काढून त्यांच्याबद्दल आदर व्यक्त केला होता. 9 नोव्हेंबर 1962 रोजी वयाच्या 104 व्या वर्षी महर्षी कर्वे यांचे निधन झाले.

1989 :  पश्चिम आणि पूर्व बर्लिनला वेगळे करणारी बर्लिनची भिंत पाडण्यात आली 

दुसऱ्या महायुद्धात हिटलरच्या पाडावानंतर जर्मनीची पूर्व आणि पश्चिम जर्मनी अशी फाळणी झाली. तीन दशकांपासून पश्चिम आणि पूर्व बर्लिनला वेगळे करणारी बर्लिनची भिंत 9 नोव्हेंबर 1989 रोजी पाडण्यात आली.  1961 मध्ये बांधलेली या भींतीची लावी तब्बल 45 किलोमीटर होती. जर्मनीच्या पूर्व भागावर कम्युनिस्टांचा प्रभाव होता. तर, पश्चिम भागावर अमेरिकन, भांडवलशाहीच्या प्रभावाचे सरकार होते. सोव्हिएत रशियाचा प्रभाव कमी होऊ लागल्यावर शीत युद्धाची तीव्रताही कमी होऊ लागली. त्यानंतर 1989 मध्ये अखेर बर्लिनची भिंत पाडली गेली आणि एकसंध जर्मनीची स्थापना झाली.  

2000 : उत्तराखंड राज्याची स्थापना 

अनेक वर्षांच्या आंदोलनानंतर 9 नोव्हेंबर 2000 रोजी उत्तराखंडचा भारताच्या प्रजासत्ताकात 27 वे राज्य म्हणून समावेश करण्यात आला.  2000 ते 2006 पर्यंत याला उत्तरांचल म्हणून संबोधले जात होते. परंतु जानेवारी 2007 मध्ये स्थानिक लोकांच्या भावनांचा आदर करून त्याचे अधिकृत नाव बदलून उत्तराखंड करण्यात आले.  उत्तराखंड हा एकेकाळी उत्तर प्रदेशचा एक भाग होता. त्याची सीमा उत्तरेला तिबेट आणि पूर्वेला नेपाळशी आहे. पश्चिमेला हिमाचल प्रदेश आणि दक्षिणेला उत्तर प्रदेश ही त्याच्या सीमेला लागून असलेली राज्ये आहेत.   उत्तराखंडला देवभूमी म्हणूनही ओळखले जाते. कारण अनेक प्राचीन धार्मिक स्थळांसह, हे राज्य हिंदू धर्मातील सर्वात पवित्र मानल्या जाणार्‍या गंगा आणि यमुना या देशातील सर्वात मोठ्या नद्यांचे उगमस्थान आहे. 

2005 : – भारताचे 10 वे राष्ट्रपती के. आर. नारायणन यांचे निधन

केरळमध्ये जन्मलेले कोच्चेरी रमन नारायणन (के.आर. नारायण) हे भारताचे दहावे राष्ट्रपती होते. त्रावणकोर विद्यापीठातून इंग्रजीमध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये अर्थशास्त्राचा अभ्यास केला. भारतातील कुशल राजकारण्यांमध्ये त्यांची गणना होते. भारतीय राजकारणातील विविध अस्थिर परिस्थितींमुळे त्यांचा कार्यकाळ अत्यंत गुंतागुंतीचा होता. के. आर. नारायणन हे  अस्पृश्य समाजाची पार्श्वभूमी असणारे भारताचे पहिले राष्ट्रपती होते. 

इतर महत्त्वाच्या बातम्या :

1922 : अल्बर्ट आइनस्टाईन यांना भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक जाहीर
1924: ख्यालगायक, गुरु व बंदिशकार पं. चिंतामणी रघुनाथ तथा सी. आर. व्यास यांचा जन्म.
1934: अमेरिकन अंतराळतज्ञ, लेखक व विज्ञानप्रसारक कार्ल सगन यांचा जन्म. 
1953: कंबोडियाला फ्रान्सपासुन स्वातंत्र्य मिळाले.
1977: सुप्रसिद्ध संगीत समीक्षक, संगीतकार, संगीत दिगदर्शक व लेखक केशवराव भोळेे यांचे निधन. 
1988: मुंबईतील भारत पेट्रोलियमच्या शुद्धीकरण संकुलातील दुर्घटना, भीषण आगीत १२ जण मृत्युमुखी.
2003:  मैथिली भाषेतील लेखक व कवी विनोद बिहारी वर्मा यांचे निधन

[ad_2]

Related posts