Happy Birthday Yuvraj Singh Know All About India Cricketers Sixer King Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Happy Birthday Yuvraj Singh : भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंह (Yuvraj Singh) आज  42 वा वाढदिवस साजरा करत आहे. युवराज सिंहचा (Yuvraj Singh Birthday ) जन्म 12 डिसेंबर 1981 रोजी झाला. युवराजनं आपल्या कारकिर्दीत अनेक मोठ्या विक्रमाला गवसणी घातलीय. जगातील सर्वात स्फोटक फलंदाजांमध्ये युवराज सिंहची गणना केली जाते. 2011 आणि 2007 च्या विश्वचषक (World Cup) विजयात युवराजचा वाटा मोठा होता. 2011 विश्वचषकादरम्यान (2011 World Cup) कॅन्सरसोबत लढला, रक्ताच्या उलट्याही केल्या, पण त्याने हार मानली नाही. 

युवराज सिंहच्या नेतृत्वाखाली भारतानं 2000 मध्ये प्रथमच अंडर-19 विश्वचषक जिंकला होता. या संपूर्ण स्पर्धेत युवराजची कामगिरी उत्कृष्ट होती. या स्पर्धेत उत्तम कामगिरी केल्याबद्दल त्याला प्लेअर ऑफ द टूर्नामेंटचा पुरस्कारही देण्यात आला. त्यानंतर भारतानं 2007 मध्ये टी-20 विश्वचषक आणि 2011 मध्ये एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता. युवराज सिंह या दोन्ही विश्वचषकविजेत्या संघाचा सदस्य होता. या दोन्ही स्पर्धेत त्याना मालिकावीर पुरस्कार पटकावला. 2011 विश्वचषकादरम्यान तो मैदानावर तर लढतच होता, पण त्याचवेळी त्याने कॅन्सरशीही लढा दिला. युवराजच्या लढाऊ वृत्तीला आजही क्रिकेट चाहते सलाम ठोकतात. युवराजला भारताचा सर्वात मोठा मॅचविनर खेळाडू म्हटले जातेय.

सर्वात जलद अर्धशतक

भारतानं 2007 मध्ये महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात पहिला टी-20 विश्वचषक जिंकला होता. भारताच्या विजयात स्टार फलंदाज युवराज सिंहनं महत्वाची भूमिका बजावली. या संपूर्ण स्पर्धेत युवराज सिंहनं भारतासाठी सातत्यानं धावा केल्या. या स्पर्धेत युवराज सिंहनं इंग्लंडविरुद्ध सामन्यात अवघ्या 12 चेंडूत अर्धशतक ठोकलं होतं. याच सामन्यात युवराजनं सहा चेंडूत सहा षटकार ठोकले होते. युवराजनंतर नेदरलँड्सचा फलंदाज स्टीफन मायबर्गनं 2014 च्या विश्वचषकात 17 चेंडूत अर्धशतकीय खेळी केली. 

2011 च्या विश्वचषकात चमकदार कामगिरी

2011च्या एकदिवसीय विश्वचषकात युवराज सिंहनं चमकदार कामगिरी केली. त्यानं 2011 मध्ये भारताला विश्वचषक जिंकून दिला होता. या विश्वचषकात त्यानं 362 धावा केल्या आणि 15 विकेट घेतल्या. त्याच्या अष्टपैलू कामगिरीबद्दल त्याला प्लेअर ऑफ द टूर्नामेंटचा पुरस्कारही देण्यात आला होता. 2011 विश्वचषकावेळी युवराजची अवस्था फारच वाइट होती. कॅन्सर झाल्यामुळे मानसिक आघात होताच, पण त्यात खेळत असताना रक्ताच्या उलट्या होत होत्या. तरिही त्याने फलंदाजी केली. तो मैदानावर उभा राहिला आणि त्याने आपला सर्वोत्तम खेळ दाखवत भारताला विजेतेपद मिळवून दिले. संघासाठी युवराजने कॅन्सरसारखा आजार लपवून विश्वचषकात भाग घेतला होता. त्या विश्वचषकात एकीकडे युवराज मैदानावर गोलंदाजांची धुलाई करत होता, तर दुसरीकडे त्याला रक्ताच्या उलट्या होत होत्या.

युवराज सिंहची कारकिर्द

युवराज सिंहनं भारतासाठी 40 कसोटी, 304 एकदिवसीय आणि 58 टी-20 सामन्यात भारताचं प्रतिनिधित्व केलंय. कसोटीत युवराज सिंहनं 1 हजार 900 धावा केल्या आहेत. ज्यात त्यानं तीन शतकं आणि 11 अर्धशतक झळकावली आहेत.  तर, एकदिवसीय क्रिकेटमध्ये 14 शतक आणि 52 अर्धशतकांच्या जोरावर त्यानं 8 हजार 701 धावा (सर्वोत्तम धावसंख्या- 169) केल्या आहेत. तर, टी-20 क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 1 हजार 177 धावांची (सर्वोत्तम धावसंख्या- 150) नोंद आहे. ज्यात 8 अर्धशतकांचा समावेश आहे. युवराज सिंहनं आयपीएलमध्ये 132 सामने खेळले आहेत. ज्यात त्यानं 2 हजार 750 धावा (सर्वोत्तम धावसंख्या-83) केल्या आहेत. 



[ad_2]

Related posts