Former India Cricketer Bishan Singh Bedi Blog By Sameer Gaikwad

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

विव्ह रिचर्ड निवृत्त झाल्यानंतर मी क्रिकेटचा नाद सोडलाय. मात्र त्या काळात जे लोक मनात ठाण मांडून बसलेत त्यांना रुक्षपणे बाहेर काढून भिरकावून देऊ शकत नाही. त्यातलाच एक भला माणूस म्हणजे बिशनसिंग बेदी होय. 

आज त्यांचे निधन झालेय. त्यांच्या पाठीमागे उरल्यात त्या काही भेदक आठवणी. १९७६ मध्ये इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर आला होता. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जॉन लिव्हरने ७ विकेट्स पटकावत संघाच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली. जॉन लिव्हरने डोक्याला व्हॅसलिन लावलेलं. त्याने डोक्याला पट्टी लावलेली. त्या सामन्यात रुबेन नावाचे मुंबईचे अंपायर होते. ते पोलीसखात्यात ठसातज्ज्ञ होते. लिव्हर गोलंदाजी करत असताना पडलेली एक पट्टी त्यांनी पट्टी खिशात ठेवली. व्हॅसलिनमुळे चेंडू स्विंग होत होता. बेदी यांनी त्याला आक्षेप घेतला. बोर्डाने तो बॉल लॉर्ड्सला पाठवला. केमिकल ऍनलायझरकडे. बेदी यांनी बीसीसीआयला सुनावलं की भारतात केमिकल ऍनलायझर नाही का? पण बीसीसीआयने तो चेंडू पाठवला. बेदी याप्रकाराने वैतागले. व्हॅसलिनच्या पट्ट्या सापडूनही लिव्हरवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यावेळी बीसीसीआयने व्हॅसलिन वापराचे पुरावे असतानाही कर्णधार बेदी यांना पाठिंबा दिला नाही. कारण हा माणूस बीसीसीआयला डोईजड वाटे!    

याच मालिकेत बेदी यांनी लिव्हर आणि बॉब विलीस यांच्यावर चेंडू कुरतडल्याचा अर्थात बॉल टेंपरिंगचा आरोप केला होता. इंग्लंडने ती मालिका जिंकली होती. पण त्यांच्या खेळात काहीतरी संशयास्पद असल्याचा बेदी यांना वाटत होतं. इंग्लंड संघाने हे आरोप फेटाळून लावले. या मालिकेत कार्यरत पंच रुबेन यांनी नंतर एका मुलाखतीत सांगितलं की आम्हाला व्हॅसलिनची पट्टी सापडली होती. इंग्लंडचा कर्णधार टोनी ग्रेगने ती पट्टी व्हॅसलिनची असल्याचं सांगितलं होतं. रुबेन यांनी सांगितलं की असं घडायला नको होतं. पण आम्ही फार काही करु शकलो नाही. बेदी यांच्या सजगपणामुळे बॉल टेपरिंगसारखं काही असतं हे आम्हाला समजलं.

तो काळ बेदी यांच्यासाठी कठीण होता. ते इंग्लंडमध्ये नॉर्दटम्पनशायरसाठी खेळायचे. या प्रकारामुळे नॉर्दटम्पटनशायरने बेदींशी असलेला करार रद्द केला. यामुळे त्यांचं आर्थिक नुकसान झालं. बेदींनी आरोप मागे घ्यावेत म्हणून दडपण आणले गेले होते मात्र ते वाकले नाहीत. बीसीसीआयने आयसीसीशी मिळतीजुळती भूमिका घेतली मात्र बेदी आपल्या आरोपांवर ठाम राहिले. परिणामी त्यांची गच्छंती झाली! बेदींचा कोंडमारा असह्य होता. त्यांनी स्पिक आऊट करायचे ठरवले तेही इंग्लंडमध्ये नि ब्रिटिश मीडियासोबत! डेअरिंगबाज माणूस होता, त्याने थेट बीबीसीला मुलाखत देऊन आधीपेक्षा टोकदार आरोप केले कारण आता त्यांच्यासोबत पुरावे होते!              

१९७४मध्ये बेदीने इंग्लंडमध्ये दिलेली मुलाखत बीसीसीआयला फार झोंबली! त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली. नियम मोडून मीडियाशी बोलल्याचे कारण पुढे केले गेले! बेदी यांना एका कसोटी सामन्यासाठी संघातून वगळण्यात आलं. ही टेस्ट मॅच भारत हरला. हा वेस्ट इंडिजविरुद्धचा सामना होता! बेंगलुरू इथे हा सामना झाला होता. प्रसन्ना, चंद्रशेखर, वेंकटराघवन, सय्यद अली, एकनाथ सोलकर यांनी गोलंदाजी केली होती. विंडीजने २१६ धावांनी सामना जिंकला! बीसीसीआयला अक्कल आली आणि बेदी पुढच्या टेस्टला संघात आले. मात्र कप्तानपदावर पाणी सोडून मानहानीकारक रित्या संघातून डच्चू मिळाल्याने बेदींना लय गवसली नाही. ५३ ओव्हर्सपैकी १३ मेडन ओव्हर टाकून फक्त १४६ धावा त्यांनी दिल्या मात्र त्यांना एकच बळी मिळवता आला! संथगती फिरकी गोलंदाज प्रसन्नाने मात्र ४ विकेट्स काढल्या. एक डाव आणि १७ धावांनी लाजिरवाणा पराभव भारतीय संघाच्या वाट्यास आला! तिसरा कसोटी सामना भारताने जिंकला! बेदींनी दोन्ही डावात मिळून ५१ ओव्हर्समध्ये १२० धावा देत ६ बळी मिळवले होते! ३-२ अशा फरकाने विंडीजने ही मालिका जिंकली! विंडीजचा तो सर्वात पॉवरफुल संघ होता! माध्यमांनी भारतीय संघाचे  कौतुक केले असले तरी बेदींना मात्र आपल्या अपमानाची सल टोचत राहिली.         

पुढच्या काळात घडलेली एक महत्वाची घटना बेदींच्या स्वभावाची नेटकी ओळख करून देणारी ठरली! राजकीय नेते आणि क्रिकेट प्रशासक अरुण जेटली यांचं नाव दिल्लीतल्या फिरोझशहा कोटला मैदानाला देण्यात आलं. या निर्णयाला बेदी यांचा विरोध होता. जेटली यांचं क्रिकेट प्रशासक म्हणून योगदान असेल पण ते क्रिकेटपटू नाहीत अशी बेदी यांची भूमिका होती. बीसीसीआयने मखलाशी केली आणि  बेदी यांचं योगदान लक्षात घेऊन या स्टेडियमधल्या एका स्टँडला बेदी यांचं नाव देण्यात येत असल्याचे जाहीर केले.  स्टँडला देण्यात आलेलं माझं नाव काढून टाका नाहीतरी मी संघटनेला न्यायालयात खेचेन अशी भूमिका बेदी यांनी घेतली होती. मोहिंदर अमरनाथ, रमण लांबा, गौतम गंभीर आणि बेदी यांची नावे स्टँडला देण्यात आली होती, दिल्ली क्रिकेट असोसिएशनशी असलेल्या विरोधातून बेदी विरोध करत आहेत असे आरोप त्यांच्यावर केले गेले. ते व्यथित झाले नि क्रिकेटपासून दूर झाले. दोन वर्षांपूर्वी पुस्तक प्रकाशन सोहळ्यात ते व्हीलचेअर बसून आले तेंव्हा अनेकांना वेदना झाल्या होत्या. 

पैशांसाठी बीसीसीआयसमोर लाचार होणाऱ्या आजच्या काळात बेदींचे वेगळेपण अधिक ठळकपणे उठून दिसते! एक व्यक्ती आणि कुटुंबप्रमुख म्हणून ही हा सरदार ग्रेट होता! आफ्टर ऑल सिंग इज किंग! नाऊ वुई मिस हिम! अलविदा सरदार!

[ad_2]

Related posts