11th September In History Today In History Acharya Vinoba Bhave Birth Anniversary Terrorist Attack On World Trade Center

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

11th September In History :  आजचा दिवस इतिहासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. भारतातील भूदान चळवळीचे प्रणेते, स्वातंत्र्यसैनिक आचार्य विनोबा भावे यांचा आज जन्मदिन आहे. आचार्य विनोबा भावे यांनी केलेल्या कार्याबद्दल त्यांना मरणोत्तर भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. आजच्या दिवशी 2001 मध्ये जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेला दहशतवाद्यांनी धक्का दिला. अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. 

1895 : भूदान चळवळीचे प्रणेते भारतरत्न आचार्य विनोबा भावे यांचा जन्म

विनायक नरहर भावे अर्थात विनोबा भावे यांचा आज जन्मदिन. विनोबा भावे यांनी भारतीय स्वातंत्र्यसैनिक म्हणून स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेतला. महात्मा गांधींनी 1940 मध्ये ‘वैयक्तिक सत्याग्रह’ पुकारला, त्यावेळी पहिले सत्याग्रही म्हणून त्यांनी भावेंची निवड केली.  ब्रिटिश राजविरोधी या आंदोलनाचे पर्यवसान 1942 मध्ये ‘छोडो भारत’ आंदोलनात झाले. त्याशिवाय ते भूदान चळवळीचे प्रणेते होते. सामाजिक विषमता दूर करण्यासाठी त्यांनी काम केले. त्यांनी सर्वोदय चळवळ सुरू केली ज्याचा अर्थ ‘सर्वांसाठी प्रगती’ होता. 1951 मध्ये विनोबा भावे यांनी तेलंगणातील पोचमपल्ली येथे भूदान चळवळ सुरू केली. गरीब आणि श्रीमंत यांच्यातील दरी कमी करणे हा यामागचा उद्देश आहे. येथे जमीन देणाऱ्यांना कोणताही मोबदला दिला गेला नाही. ही चळवळ 13 वर्षे चालली त्या काळात भावे भारतभर फिरले. भूमिहीन शेतकऱ्यांना वाटण्यासाठी त्यांनी 4.4 दशलक्ष एकर जमीन गोळा केली.

1958 मध्ये कम्युनिटी लीडरशिपसाठी रोमन मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 1983 मध्ये त्यांना मरणोत्तर भारतरत्न मिळाला. विनोबा भावे यांनी अनेक पुस्तके लिहिली. मराठी, गुजराती, संस्कृत, इंग्रजी, उर्दू आणि हिंदी यासह अनेक भाषांचे त्यांना चांगले ज्ञान होते. 

1948 : पाकिस्तानचे प्रणेते बॅ. मोहम्मद अली जिना यांचे निधन

दक्षिण आशियातील महत्त्वपूर्ण वकील, राजकारणी आणि पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिना यांचे आजच्या दिवशी निधन झाले. 

प्रारंभीच्या काळात जिनांवर उदारमतवादाचा प्रभाव होता. मवाळ काँग्रेसी नेते त्यांना हिंदू -मुस्लिम ऐक्याचे अग्रदूत म्हणत. 1916च्या लखनौ करारात जिनांचा महत्त्वाचा सहभाग होता . या कराराच्या माध्यमातून हिंदू -मुस्लिम ऐक्याचे प्रयत्न त्यांनी केला.

1916 साली मुंबई प्रांत परिषदेच्या अध्यक्षपदावरून त्यांनी हिंदू -मुस्लिम ऐक्याचा प्रसारही केला परंतु याचवेळी त्यांनी मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची आवश्यकता प्रतिपादन केली. पहिल्या महायुद्धानंतर राष्ट्रीय चळवळीचे सूत्रे महात्मा गांधीकडे गेली. मात्र सविनय कायदेभंग, असहकार इ. गोष्टी जिनांना मान्य होणाऱ्या नव्हत्या. गांधीनी पाठिंबा दिलेल्या खिलाफत चळवळीबद्दलही जिनांना आस्था नव्हती. गांधीची कामे देशाला गर्तेत ढकलणारी आहेत असे त्यांचे मत होते.

मुसलमानांच्या काही मागण्या काँग्रेसने मान्य केल्यास स्वतंत्र मतदारसंघाची मागणी रद्द करण्याची तयारी त्यांनी दर्शवली. परंतु हा प्रस्ताव नाकारला गेला व मुस्लिम राष्ट्रवाद बळावयास त्यामुळे मदत झाली. 1937 साली निवडणुकीनंतर बहुमत काँग्रेसला मिळाल्यामुळे लीगची गरज संपली, त्यामुळे जिना दुखावले व ते काँग्रेसपासून दूर गेले. येथूनच त्यांनी द्विराष्ट्रवादाचा पुरस्कार करण्यास सुरुवात केली. त्याला ब्रिटिशांकडून खतपाणी मिळत गेले. अखेर भारताची फाळणी होऊन पाकिस्तान हा नवा देश निर्माण झाला. 15 ऑगस्ट 1947 ते 11 सप्टेंबर 1948 (त्यांच्या निधनापर्यंत) ते पाकिस्तानचे पहिले गव्हर्नर जनरल होते. 

2001 : अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर दहशतवादी हल्ला 

जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेच्या इतिहासातील काळा दिवस म्हणून 11 सप्टेंबर 2001 या दिवसाची नोंद होईल असे कोणाला वाटले नसेल. अल कायदा या दशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यांनी प्रवासी विमानांचे अपहरण करून अमेरिकेतील जागतिक व्यापार केंद्राच्या (वर्ल्ड ट्रेड सेंटर) दोन इमारतींवर दहशतवादी हल्ला केला. या हल्ल्याने अमेरिकाच नव्हे तर संपूर्ण जग हादरून गेले होते. वर्ल्ड ट्रेड सेंटरशिवाय अमेरिकेच्या संरक्षण विभागाची इमारत असलेल्या पेंटागॉनवरही दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. 

वर्ल्ड ट्रेड सेंटरची इमारत कोसळल्यानंतर अनेक तास मदत आणि बचाव कार्य सुरू होते. मदत आणि बचाव पथकाकडून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांची सुटका करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू होते. वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ल्यात जवळपास 3000 नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले होते.  

बोस्टन व वॉशिंग्टन या विमानतळांवरून सॅन फ्रान्सिस्को व लॉस एंजेल्सकडे जाणाऱ्या विमानांमध्ये ‘अल कायदा’चे १९ दहशतवादी होते. या विमानांनी हवेत उड्डाण केल्यानंतर थोड्याच वेळात दहशतवाद्यांनी वैमानिक व इतर कर्मचाऱ्यांना ठार केले व विमानांचा ताबा मिळवला. हल्ल्यातील सर्व मुख्य दहशतवाद्यांनी विमान उडवण्याचे प्रशिक्षण घेतले होते. 

इतर महत्त्वाच्या घटना 

1893: स्वामी विवेकानंद यांनी जागतिक सर्वधर्म परिषदेसमोर आपले गाजलेले भाषण केले.
1901: साहित्यिक आत्माराम रावजी देशपांडे तथा कवी अनिल यांचा जन्म.
1911: भारतीय क्रिकेटपटू लाला अमरनाथ यांचा जन्म.
1915: भारतीय कला व संस्कृतीच्या पुरस्कर्त्या पुपुल जयकर यांचा जन्म.
1942: आझाद हिंद सेनेने जन गण मन राष्ट्रगीत म्हणून गायले.
1965: भारतीय सैन्याने लाहोर जवळील बुर्की गाव ताब्यात घेतले.
1973: चिलीचे राष्ट्राध्यक्ष मार्क्सवादी नेते साल्वादोर अॅलेंदे याचं निधन
1976: भारतीय क्रिकेटर मुरली कार्तिक यांचा जन्म.
1982: तामिळ चित्रपट अभिनेत्री श्रीया शरण यांचा जन्म.
1987: हिन्दी कवयित्री, स्वातंत्र्यसनिैक, शिक्षणतज्ज्ञ महादेवी वर्मा यांचे निधन
2007: रशियाने सगळ्यात मोठ्या बॉम्बची चाचणी केली. याचे नाव फादर ऑफ ऑल बॉम्ब असे ठेवण्यात आले. 

[ad_2]

Related posts