[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
अरबी समुद्राच्या आग्नेय भागात उद्भवलेल्या बिपर्जयने उत्तरेच्या दिशेने आगेकूच सुरू ठेवली होती. ११ जूनला या चक्रीवादळाने अतिभयंकर रूप धारण केले. त्या वेळी ताशी १६० किमी वेगाने वारे वाहत होते. यानंतर या चक्रीवादळाची तीव्रता काहीशी मंदावली. परंतु गुरुवारी कच्छ व सौराष्ट्राच्या किनारपट्टीस ते अतिशय वेगाने थडकण्याचा अंदाज आहे. ‘गेल्या सहा तासांपासून या चक्रीवादळाचा वेग मंदावला आहे. ते दिशा बदलणार असल्याचे हे लक्षण आहे. त्यानुसार हे चक्रीवादळ आज, बुधवारी दिशा बदलून गुरुवारी कच्छ व सौराष्ट्रात पोहोचेल. गुरुवारी संध्याकाळी जखाऊ बंदराजवळ ते थडकेल,’ असे महापात्र म्हणाले. सध्या त्याचा वेग कमी झाला असला तरी गुजरातमध्ये ते थडकताना ताशी १२५ ते १३५ व प्रसंगी ताशी १४५ किमी वेगाने वारे वाहण्याची चिन्हे आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
परिणाम काय?
चक्रीवादळामुळे कच्छ व सौराष्ट्राच्या सखल किनारी भागांत नेहमीच्या तुलनेत कितीतरी अधिक उंचीच्या लाटा उसळतील. या परिसरातील कच्च्या घरांची भयंकर हानी होण्याची शक्यता आहे. गिर, सोमनाथ व द्वारका येथील पर्यटनावर निर्बंध घालण्यात आले असून बिपर्जयच्या प्रभावामुळे राजस्थानच्या दक्षिण भागात व मध्य प्रदेशच्या पश्चिम भागातही पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
पावसाने झोडपले
गुजरातच्या किनारी भागात बुधवारी सकाळपासूनच या चक्रीवादळाचा प्रभाव जाणवला. सौराष्ट्र व कच्छच्या अनेक भागात बुधवारी जोरदार वाऱ्यांसह अतिवृष्टी झाली. प्रामुख्याने देवभूमी द्वारका, राजकोट, जामनगर, पोरबंदर आणि जुनागढला पावसाने सर्वाधिक झोडपले. देवभूमी द्वारका जिल्ह्यात १२१ मिमी पावसाची नोंद झाली. तर, द्वारका (९२ मिमी), कल्याणपूर (७० मिमी) येथेही अतिवृष्टी झाली.
५० हजार नागरिक सुरक्षितस्थळी
मांडवी/अहमदाबाद : बिपर्जय चक्रीवादळ थडकणार असल्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षात्मक उपाय म्हणून गुजरातच्या किनारी भागातील ५० हजार नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. किनारी भागाच्या १० किमी परिघातील ग्रामस्थांना घरे सोडण्यास सांगण्यात येत असून त्यांना तात्पुरत्या ठिकाणी हलविण्यात आले आहे. या चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका हा कच्छला बसण्याची शक्यता असल्याने त्या परिसरात प्रशासनाकडून अधिक काळजी घेतली जात आहे.
पाकिस्तानमध्येही पूर्वतयारी
कराची : पाकिस्तानच्या किनारी भागांतील हजारो नागरिकांनाही बुधवारी सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. पाकिस्तानमधील थट्टा, बदिन, सजवल, थारपारकर, कराची, मीरपूर खास, उमरकोट, हैदराबाद, ओरमारा, टांडा अल्लाहयार आणि टांडो मोहम्मद खान या ठिकाणांना बिपर्जयचा सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे. या ठिकाणच्या ५६ हजार ९८५ नागरिकांना अद्याप सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.
[ad_2]