म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली : बनावट औषधे तयार करणाऱ्या कंपन्यांना वेसण घालण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कडक कारवाई सुरू केली आहे. उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशमध्ये सर्वांत मोठी कारवाई करताना येथील अनुक्रमे २२ व २६ कंपन्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. यातील ११ कंपन्यांना उत्पादन थांबवण्याचे आदेश देण्यात आले असून दोन औषध कंपन्यांना केंद्राने टाळे ठोकले आहे.आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, भारतीय औषधांवर विदेशात प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाण्याचे प्रमाण वाढल्यावर भारताचे औषध महानियंत्रक (डीसीजीआय) आणि राज्य औषध नियामक यांनी देशभरातील औषध कंपन्यांच्या तपासणीची मोहीम तीव्र केली आहे. देशात सध्या तीन हजारांहून जास्त औषध उत्पादक कंपन्या आहेत. गेल्या सहा महिन्यांत १३४ औषध कंपन्यांची तपासणी करण्यात आली. तेव्हा बनावट औषध निर्मितीत हिमाचल प्रदेश आघाडीवर असल्याचे आढळले. तेथील कंपन्यांची नावे मात्र जाहीर करण्यात आलेली नाहीत. महाराष्ट्रात अशी एक कंपनी आढळली आहे. त्याचप्रमाणे गेल्या तीन वर्षांपासून दर्जेदार औषध उत्पादन न केल्याची नोंद असलेल्या कंपन्यांची माहिती गोळा करण्यास राज्य सरकारांना सांगितले आहे.
दरम्यान, भारतात तयार करण्यात आलेल्या खोकल्यावरील सीरपमुळे विदेशात झालेल्या कथित मृत्यूंबाबतची प्रकरणे समोर आल्यावर याबाबतीत धडक कारवाईचे निर्देश केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी काही महिन्यांपूर्वी दिले होते.
१७.६ अब्ज डॉलरच्या कफ सीरपची निर्यात
भारताने २०२२-२३मध्ये १७.६ अब्ज डॉलर मूल्याच्या कफ सीरपची निर्यात केली. त्याआधी सन २०२१-२२मध्ये ही निर्यात १७ अब्ज डॉलरची होती. जगात विविध लशींच्या जागतिक मागणीच्या ५० टक्क्यांहून अधिक लशींचा भारत पुरवठादार आहे. अमेरिकेतील मागणीच्या सुमारे ४० टक्के आणि इंग्लंडमध्ये सुमारे २५ टक्के औषधांचा पुरवठाही भारत करतो.