manipur horrific viral video what happend on thebol village fir incident

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Manipur Horrific Viral Video : मणिपूरच्या घटनेनं संपूर्ण देश हादरला आहे. रस्त्यावर रडणाऱ्या-हातापाया पडणाऱ्या दोन निर्वस्त्र महिला, त्यांना फरफटत नेणारा जमाव. क्रोर्याच्या सर्व सीमा ओलांडणारी ही घटना. मणिपूरचा हा व्हिडिओ (Horrific Viral Video) संपूर्ण देशासाठी लाजीरवाणी घटना होती. या घटनेनं देशभरात संतापाची लाट पसरली आहे. ही घटना 4 मे रोजी घडली. पण धक्कादायक म्हणजे पोलिसांनी याप्रकरणी तब्बल 49 दिवसांनंतर FIR नोंदवला. तर पहिली अटक करण्यासाठी पोलिसांना 78 दिवस लागले. मणिपूर सरकारनेही (Manipur Government) हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईला सुरुवात केली. मणिपूर सरकारवर निष्काळजीपणाचा आरोप केला जात आहे. या घटनेचे राजकीय पडसादही उमटू लागले आहेत. विरोधकांनी मणिपूरमधल्या भाजप सरकार (BJP Government) आणि केंद्र सरकारवर ताशेरे ओढले आहेत. 

काय आहे नेमकं प्रकरण?
मणिपूरमध्ये 3 मार्च रोजी कुकी समुदायाकडून काढण्यात आलेल्या ‘आदिवासी एकता मोर्चा’ला हिंसळ वळण लागलं. यात कुकी आणि मैतेई समाजात मोठ्या प्रमाणार हिंसाचार होऊन मणिपूर पेटलं. हिंसेच्या दोन महिन्यानंतर मणिपूरच्या कांगकोपी भागात कुकी समाजाच्या दोन महिलांना निर्वस्त्र करुन रस्त्यावर त्यांची धिंड काढण्यात आली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. दोन महिलांची निर्वस्त्र धिंड काढण्यात आल्यानंतर त्यांच्यावर सामुहिक अत्याचार करण्यात आला. या घटनेचे पडसाद आता देशभर उमटतायत. 

प्रकरणाचा संपूर्ण घटनाक्रम
ही घटना 4 मे रोजी असल्याचं सांगितलं जात आहे. हा व्हिडिओ मणिपूरमधल्या कांगकोपी इथला आहे. दोन्ही महिला कुकी समाजाच्या असून त्यांची निर्वस्त्र धिंड काढणारे लोक मैतेई समाजाचे असल्याचं बोललं जातंय. 

3 मे –  मणिपूरमध्ये कुकी आणि मैतेई समुदायात हिंसाचार झाला.
4 मे – कांगकोपीत दोन महिलांची निर्वस्त्र धिंड काढली आणि याचा व्हिडिओ बनला
18 मे – या प्रकरणात तक्रार दाखल करण्यात आली
21 जून – पोलिासांनी गुन्हा दाखल केला.
19 जुलै – व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
20 जुलै – व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मुख्य आरोपीला अटक
20 जुलै – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटनेवर दु:ख व्यक्त केलं
20 जुलै – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मणीपूरच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. मुख्यमंत्री बीरेन सिंह यांनी दोषींना कठोर शिक्षा देण्याचं आश्वासन दिलं

कधी करण्यात आली होती तक्रार?
या घटनेची तक्रार 18 मे रोजी करण्यात आली होती. पीडित महिलांनी तक्रारीत म्हटल्यानुसार 4 मे रोजी दुपारी तीन वाजता अज्ञात लोकांनी त्यांच्या गावावर हल्ला केला. जवळपास 900 ते 1000 लोकांच्या जमावाने थोबलमधल्या गावावर हल्ला केला. हल्लेखोर हे मैतेई समाजाची लोकं होती. या लोकांनी गावातील घरांना आग लावली, यादरम्यान त्यांनी गावातील घरांमध्ये लुटपाटही केली. पैसे, दागिने आणि किमती वस्तू त्यांनी उचलून नेल्या. हल्ला झाल्याने तीन महिला वडिल आणि भावाबरोबर जंगलात पळाल्या. पोलिसांनी त्यांना वाचवलं. पण पोलीस ठाण्याच्या दिशेने जात असताना जमावाने पोलिसांची गाडी अडवली. संतप्त जमावाने तीन महिला आणि त्यांचे वडिल तसंच भावाला पोलिसांकडून हिसकावून घेतलं. ही घटना पोलीस स्थानकापासून अवघ्या दोन किलोमीटवर घडली. धक्कादायक म्हणजे जमावाने पोलिसांसमोरच महिलांच्या वडिलांची निर्घृण हत्या केली. त्यानंतर तीनही महिलांचे कपडे उतरवले. यातील महिलांचं वय 21, 42 आणि 52 असं होतं. 

तीनही महिलांचे कपडे काढून त्यांना विवस्त्र करण्यात आलं आणि त्यांची रस्त्याने धिंड काढण्यात आली. यावरच ते थांबले नाहीत तर यातील 21 वर्षांच्या मुलीव सामुहिक अत्याचार करण्यात आला. तिचा भाऊ तिला वाचवण्यासाठी आला असता जमावाने त्याचीही हत्या केली. पण याप्रकरणी पोलिसांनी तब्बल 1 महिन्यांनी FIR दाखल केली. पोलिसांनी आरोपींवर IPC कलम 153ए, 398, 427, 436, 448, 302, 354, 364, 326, 376, 34 अंतर्गत गुन्हा दाखल केला. पण कोणालाही अटक झाली नाही, किंवा कोणतीही कारवाई झाली नाही. 

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ
तब्बल 78 दिवसांनंतर या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली. मणिपूर सरकारवर टीका करण्यात आली. त्यानंतर जागे झालेल्या पोलिसांनी 20 जुलैला पहिली अटक केली. याप्रकरणी मुख्य आरोपी खुयरूम हेरादासला पोलिसांनी अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपीचं वय 32 असून व्हायरल झालेल्या व्हिडिओवरुन आरोपीची ओळख पटवण्यात आली. मुळात 4 मे रोजी ही घटना घडली, 18 मे रोजी तक्रार दाखल करण्यात आली. 49 दिवसांनंतर म्हणजे 21 जूनला FIR दाखल करण्यात आलं. तर अडीच महिन्यांनतर आरोपीला अटक करण्यात आली. यावरुन मणिपूर पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. 

Related posts