नवरेदव आला नाही म्हणून नवरीमुलीने भावोजीसह केलं लग्न; सामूहिक विवाहसोहळ्यात धक्कादायक प्रकार

( प्रगत भारत । pragatbharat.com)

उत्तर प्रदेशातील झाशी येथे मुख्यमंत्री सामूहिक विवाहसोहळ्यातील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नवरदेव पोहोचला नाही म्हणून नवरीमुलीने थेट आपल्या भावोजींसहच लग्नगाठ बांधली. पण जेव्हा तिची पोलखोल झाली तेव्हा लगेच कुंकू पुसत हा सगळा प्रकार लपवण्याचा प्रयत्न करण्यात आला. दरम्यान यासंबंधी समाज कल्याण अधिकारी ललिता यादव यांनी या प्रकरणाची दखल घेतली असून, तपास केला जाईल असं सांगितलं आहे. 

झांशीच्या पॉलिटेक्निक कॉलेजच्या मैदानात हा सगळा प्रकार घडला आहे. मंगळवाीर येथे सामूहिक विवाह सोहळ्याअंतर्गंत अनेक जोडप्यांचं लग्न लावण्यात आलं. पण यावेळी एका नवरीमुलीसह लग्न करण्यासाठी तिचा नवरदेव पोहोचलाच नाही. यानंतर तिचं लग्न तिच्या भावोजीशीच लावून दिलं. पण लग्न झाल्यानंतर तिने कुंकू पुसत हा प्रकार लपवण्याचा प्रयत्न केला. 

काय आहे प्रकरण?

27 फेब्रुवारीला मुख्यमंत्री सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी अनेक जोडी जोडपी सहभागी झाली होती. यावेळी एका जोडप्याकडे पाहिलं असता, थोडा संशय आला. यानंतर चौकशी करण्यात आली असता हा सगळा प्रकार उघडकीस आला. 

झांशीच्या बामोरमधील खुशीचं लग्न मध्य प्रदेशच्या वृषभानशी ठरलं होतं. सामूहिक विवाहसोहळ्यात त्यांचा रजिस्ट्रेशन क्रमांक 36 होता. पण लग्न झाल्यानंतर खुशीने लगेचच कुंकू पुसलं आणि टिकलीही काढून टाकली. तर दुसकीकडे नवरदेवाला याबाबत विचारण्यात आलं असता त्यानेही आपलं खऱं नाव दिनेश असून छतरपूर नव्हे तर बामोरचा राहणारा असल्याची कबुली दिली. 

दिनेशने सांगितलं की, तिचं लग्न वृषभानशी होणं अपेक्षित होतं. पण तो न आल्याने काही लोकांच्या सांगण्यानुसार तो वृषभानच्या जागी उभा राहिला. आपण विवाहित असून, तिचा भावोजी असल्याची कबुलीही त्याने दिली आहे. 

दरम्यान, सूत्रांच्या म्हणण्यानुसार विवाह सोहळ्यात सरकारकडून मिळणारी आर्थिक मदत मिळवण्यासाठी हा सगळा डाव रचण्यात आला होता. यामध्ये विभागीय अधिकारी आणि कर्मचारीही सहभागी झाल्याचा आरोप आहे.

नवरीमुलीने काय सांगितलं?

नवरीमुलीने आपलं नाव छवी असल्याचं सांगितलं आहे. पण ती वारंवार आपलं नाव बदलून सांगत आहे. तिचं म्हणणं आहे की, विवाह सोहळ्यात माझा होणारा पती आला नव्हता. पाऊस पडत असल्याने तो फार दूर होता. यामुळेच आपल्याला भावोजीशी लग्न करावं लागलं. हे फार चुकीचं आहे याची आम्हाला जाणीव आहे. पण आमचीही अडचण झाली होती. फॉर्म भरलेला होता. सर्वकाही ऑनलाइन नोंद झालं होतं. मी मंडपात पोहोचली होती, यामुळे लग्न करावं लागलं. 

समाज कल्याण अधिकारी ललिता यादव यांनी मात्र असं काही होणं अशक्य असल्याचं सांगत अंग झटकण्याचा प्रयत्न केला. पण जर असं झालं असेल आणि तक्रार मिळाली तर कारवाई करु असं आश्वासन त्यांनी दिलं आहे. 

Related posts